मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) काही दिवसांपूर्वी ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकावर फलाट रुंदीकरणासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यादरम्यान ९०० हून अधिक रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु याकाळात प्रवाशांचा खोळंबा आणि गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने (BEST) अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. अतिरिक्त बससेवेमुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला असून मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे बेस्टला चांगलाच फायदा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३२ ते ३३ लाख असते. मात्र मध्य रेल्वेच्या ब्लॉक काळात बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी तीन दिवस ५५ अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये जादा ५५ बसच्या ४८६ फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यासोबत यामध्ये वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश होता. ब्लॉक कालावधील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात बस सेवेचा वापर केल्याने बेस्टच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
नेहमीपेक्षा उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ
मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या कालावधीत १ जून रोजी बेस्ट बसमधून २७ लाख ३७ हजार ९७६, तर २ जून रोजी १९ लाख ६० हजार ५१२ मुंबईकरांनी प्रवासा केला होता. या दोन दिवसांत बेस्टला तीन कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले असून ते नेहमीच्या उत्पन्नापेक्षा १० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती बेस्टकडून मिळाली आहे.