Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलविवाहास विलंब, ज्वलंत समस्या

विवाहास विलंब, ज्वलंत समस्या

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

लग्न जुळण्यात मुलींचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. एक तर प्रमाण कमी आणि त्यात अटी भरमसाट, सामंजस्याचा अभाव, अपेक्षांच ओझं, करिअर, शिक्षण, स्वातंत्र्य, पॅकेज, गाडी, शेत, घर, फ्लॅट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विभक्त कुटुंबपद्धती हवी. मी तुम्हाला मागील पिढीने काय सहन केलं? काय होतं? किती केलं? हे सांगणार नाही. पण पर्यायाने तुलना करत असताना, तिथे हा फरक आपल्या लक्षात आणून देण्यासाठीचा उल्लेख करणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षण, संगोपन, नोकऱ्या देऊन मोठं करणं सोपं नसतं. खस्ता खात, कर्ज काढणं, काडी-काडी जमवून उभारलेला संसार आणि घर जबाबदारीच्या ओझ्याखाली घराचा गाडा ओढने. ही जाणीव मात्र केवळ एकदा ठेवून होत नाही, प्रत्येक मुद्दा हाताळूया.

मुलीचे पिता अगदी निवृत्तीपर्यंत स्वतः घर घेऊ शकत नाहीत, कर्ज फेडू शकत नाहीत, तर मुलींना आताच सत्तावीस वर्षांच्या मुलाकडून स्वतःच्या मालकीचे तेही वन बीएचके घर मुलाच्या नावावर हवे, अशी मागणी किंवा अट्टहास! शिक्षण, नोकरी, सेटल करिअर करणाऱ्या मुलाने डायरेक्ट आपले जन्मदात्रे सोडून द्यावेत का? जी मुलगी नववधू म्हणून घरात आल्या आल्या आपल्या तळहाताचा पाळणा करून, जीवापाड जपत प्रेमाने लाडीगोडीनं मोठं केलेल्या आई-वडिलांना लगेच सोडून द्यायचं का? घराबाहेर! त्यांचा पुढचा आधार, जबाबदारीची जाणीव, बचतीचा मार्ग, सुसंस्काराचे वळण, थोरा-मोठ्यांची आदरयुक्त भीती, घराचं घरपण हे मात्र हल्लीच्या मुलींना काहीच नको असतं. एका दिवसात ७० कॉल्स करणारी आई मुलीला इतकं डिस्टर्ब कशी करू शकते? पिल्लू, सोन्या काय खाल्लंपासून ते असंच कर आणि तसंच कर! इतका इंटरफेअर का? कसे टिकतील संसार? मग का हो नाही जाणार वाया ही पिढी! वाढणारच ना घटस्फोटाचे प्रमाण. आई-वडिलांनी, नातेवाइकांनी गरज पडली तर मदत करा. हा छळ, मारहाण होते तर नक्कीच जाब विचारा! पण सगळं सुरळीत चालू असताना, सुखात नांदताना, तुम्ही तुमच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करणार? ती कमावती असली, तरी त्याचाही संसार आहे, तिला तिचे आई-वडील हवेत. त्याला मात्र त्याच्याच घरात त्याचे आई-वडील सोडायला लावायचे? हे कुठले शहाणपण मूर्खपणाचे लक्षण! आजकाल एक किंवा जास्तीत जास्त दोन मुले. घरी तीन-चार माणसंच असतात, तरी त्यातूनही वेगळे राहायला हवे!

पापड, लोणचे विकून मुलाला मोठा अधिकारी बनवणारी विधवा आई सून घरात आली की, तिला सांभाळत नाही. कवडी कवडी जमवून, पन्नास वर्षे सांभाळून धरून बांधून ठेवलेलं घर अचानक सोडायचे का हो! मग उतारवयात आयुष्यभर कष्टमय केलेल्या, आजारपण वाढलेल्या आई-वडिलांनी जायचं कुठे? हो आताच्या मुलींचे मॅच्युरिटी आलेले परिपक्व वय २७, २८, ३० या काळापर्यंत कोणती मॅच्युरिटी शिल्लक असते येण्याची? बाकी सगळं शहाणपण असतं, मोठमोठे निर्णय तुम्ही कॉर्पोरेट युगात घेणाऱ्या स्वतंत्र विचारसरणीच्या मुली. याचे काही विशेष ज्ञान देण्याची गरज भासते का? का होतात या चुका? स्वतःच्या घराचे माणसांचे पटवून घेणं शहाणपणाच आहे, याची जाणीव असावी. स्वतःच्या चुकांची, कर्तव्याची कामाची जाणीव या वयापर्यंत कळायलाच हवी.

पालक मात्र पिल्लू, सोन्या बोलून तिच्या मतांची पाठराखण करून दुजोरा देतात. तेव्हा इतरांच्या मनाचाही विचार करायला हवा. तसं पाहिलं तर सर्वप्रथम दोन मने जुळणारे, दोन जीव मनोमीलन, कुटुंबाचे ऋणानुबंध जोडणारा विवाह हा हेतू; पण हल्ली पाहिले, तर घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. लग्न टिकत नाहीत. पाश्चात्त्य अंधानुकरण होते. हा आपला देश भारत आहे, अमेरिका नाही. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापराने जखडलेल्या मेंदूत संस्काराची रीतभात, संवेदना, ओलावा, जिव्हाळा ही मूल्य गुगलवर सापडतील? का तर फक्त शिक्षणाचा वापर स्वातंत्र्यासाठी! करिअरचा वापर टाइमपास फॅशनसाठी! आणि मिळकतीचा वापर माज, गर्व आणि असा मोकाट, बेछूट बेजबाबदारपणाचा असंवेदनशील भस्मासुर वाढला. म्हणून घटस्फोटाचे प्रमाण वाढले गेले आहे. मागच्या पिढीला आमच्या काळात काय झालं, ही उदाहरणं तुम्हाला ऐकायचीच नसतील; पण निदान आता तुमच्या जबाबदाऱ्या, वळण, संस्कार तर पाळा. आपली हिंदू संस्कृती आणि विवाह संस्था एक संस्कार आहे. आज-काल मात्र या गोष्टीला गौण किंवा दुय्यम मानलं जातंय. बदलत्या पिढीबरोबर संस्कार बदलले. शिक्षणाने सारे परिपक्व झाले; पण स्वतःसह इतरांचा विचार करणेच विसरले. आपल्याला जर संस्कारांची जाणीव झाली, तर आपल्या पुढच्या पिढीला संस्कारांची जाणीव होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -