Tuesday, May 7, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्र बंदचा फज्जा

महाराष्ट्र बंदचा फज्जा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी प्रकरणाचे निमित्त घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंदचा पुरता फज्जा उडाला. अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदार व व्यावसायिकांना दमदाटी करून दुकाने बंद पाडली. त्यानंतर पोलिसांची भर पडली. अनेक ठिकाणी राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडून बंदचा आग्रह धरताना दिसले.

सोमवारी सकाळपासूनच मुंबईसह अनेक शहरांमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी बंद पाळण्यासाठी भाग पाडले. ठाण्यात तर शिवसैनिकांनी एका रिक्षाचालकालाही बेदम मारहाण केली. मुंबईत मालवणी परिसरात काही ठिकाणी बेस्टच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलीस संरक्षण देत असतील तरच आपण बसगाड्या चालवू, असा इशारा देत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले.

राज्यात अनेक ठिकाणी शाळांना सुट्टीच जाहीर करण्यात आली. तशी सुट्टी जाहीर करावी म्हणून शाळांना सरकारकडून अघोषित आदेश दिले गेले होते, असे कळते. पोलीस बळाचाही तुफान वापर बंद यशस्वी करण्याच्या प्रयत्नात केला गेला.

ठाण्यात शिवसैनिकांच्या हाती काठ्या, उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण

लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सोमवारच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान ठाण्यात शिवसेनेची दादागिरी पाहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा – ‘आज वसूली चालू आहे की बंद?’

बंद यशस्वी करण्यासाठी सेना-राष्ट्रवादी उतरली. रस्त्यावर बाजारपेठेत एकत्र फिरून दुकाने बंद केली. मात्र रिक्षाचालक प्रतिसाद देत नसल्याने टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रम भागात उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र बंद करण्यासाठी ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर जांभळी नाका ते स्टेशन परिसर, नौपाडा या भागात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. तसेच रिक्षा चालकांना चोप देऊन रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे यामध्ये पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गाडीत टाकले आणि त्यांना मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना देखील पोलिसांनी चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव केला. एकूणच या बंदमध्ये सहभागी झालेल्या मोठे पदाधिकारी बाजूला राहिले असून अन्य पदाधिकाऱ्यांना मात्र पोलिसांकडून चोप मिळाला.

हे सुद्धा वाचा -ठाण्यात शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण

‘सत्ताधारी रस्त्यावर येऊन दादागिरीने रिक्षा व दुकाने बंद करतात, ही अत्यंत चुकीची पद्धत आहेत. शाखाप्रमुख, उपमहापौरांचे पती हे दादागिरीने रिक्षाचालकांवर काठी मारुन त्यांच्या काचा फोडतात. दुकानांचे शटर बंद करतात, हा कुठला कायदा? कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी पाळायची आहे. त्यांनीच कायदा हातात घेतला आहे, हे निषेधार्ह आहे, असे मत भाजपचे ठाण्यातील गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.

टीएमटी बंद असल्याने रिक्षासाठी मोठ्या रांगा

बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची (टीएमटी) बस सेवा बंद होती. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिक रिक्षाचा पर्याय वापरत होते. बसेस नसल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी सकाळपासूनच रिक्षासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुंबईत अज्ञात व्यक्तींकडून आठ बेस्ट बसवर दगडफेक

महाराष्ट्र बंददरम्यान अज्ञात व्यक्तींनी सोमवारी मध्यरात्री दगडफेक करून आठ बेस्ट बसेसचे नुकसान केलं आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणाने मुंबईत बस चालवण्याची योजना हाती घेण्यात आली.

बेस्टच्या धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनऑर्बिट मालाड या परिसरातील बसेसची तोडफोड झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचे कळते. एकुण सात ठिकाणी बेस्ट बसेसचे नुकसान झाल्याची माहिती बेस्ट जनता संपर्क विभागाचे मनोज वऱ्हाडे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा – हा ‘शासकीय इतमामातील’ बंद : आशिष शेलार

काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

… हा तर सरकारी दहशतवाद : फडणवीस

आज महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत नाही. राज्यात २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. ना कर्जमाफी, ना कोणती मदत. आजचा सारा प्रकार म्हणजे सरकारपुरस्कृत दहशतवाद आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे सुद्धा वाचा – महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध

या नेत्यांना शेतकऱ्यांची खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. सरकारने अनेक योजना बंद केल्या. अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्षे बंदच पाळला. पण, आताकुठे थोडे उघडले, तर पुन्हा बंद. हे अख्खे सरकारच ‘बंद सरकार’ आहे.

आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलीसही बघ्याची भूमिका घेतात. तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे. मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी बंद, चंद्रकांत पाटील यांची टीका

राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम बंद घोषणा केली. नेहेमीप्रमाणे आघाडीतील इतर सर्वांना फरफटत जावे लागले. शिवसेनेलाही सत्ता टिकविण्यासाठी पवारांचे ऐकावे लागले, असा टोला त्यांनी हाणला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची व्यापार आघाडी न्यायालयात गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.

गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबारावेळी कुठे होतात? : दरेकर

गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? मावळला ज्यावेळी भयानक क्रूर पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून गोळीबार शेतकऱ्यांवर केला, त्यावेळा आपल्या संवेदना भावना कुठं होत्या? पालघरला साधुंचं हत्याकांड झालं, त्यावेळी दोन शब्दांचा आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला नाही, संप केला नाही, त्यावेळी आपल्या संवेदना कुठं होत्या, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -