Friday, July 17, 2026

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ आपल्या अस्तित्वाने लाखो भाविकांना सन्मार्ग दाखवणाऱ्या दत्त संप्रदायाच्या कालीदास महाराजांचे बीड बायपास येथे रस्ते अपघातात निधन झाले. या अपघातात महाराजांसह त्यांची भावजय स्मिता बोरीकर यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मराठवाड्यातील अध्यात्मिक विश्वात दुःखाचे वातावरण आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंजचे कालीदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथी निमित्त गुजरातच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर वाहनाने गुंज येथे परतत असताना अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवर वाहनाचा अपघात झाला. या अपघातात कालीदास महाराज आणि त्यांची भावजय स्मिता बोरीकर या दोघांचा मृत्यू झाला. वाहनाचा चालक गंभीर जखमी आहे. चालकावर रुग्णालयात अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कालीदास महाराज मूळचे परभणी जिल्ह्यातील बोरी गावचे रहिवासी होते. बालपणी त्यांना सावत्र आईकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी घर सोडले. घर सोडल्यानंतर ते गुंज येथील चिंतामणी महाराज यांच्याकडे गेले. महाराजांकडे स्वतःची व्यथा मांडली. चिंतामणी महाराजांनी आणखी त्रास होऊ नये म्हणून मौनव्रताचा सल्ला दिला. हा सल्ला कालीदास महाराजांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तंतोतंत पाळला. तब्बल ४० वर्षे त्यांनी अवाक्षरही उच्चारले नाही. महाराज सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यायचे आणि त्यांचे म्हणणे मोजक्या आणि अचूक शब्दात एका डायरीत लिहून दाखवत होते. संवादाची ही पद्धत त्यांनी मौनव्रत धारण केल्यापासून अखेरच्या संवादापर्यंत जपली. डोळ्यांतील करूणा आणि डायरीतून संवाद साधत कालीदास महाराजांनी हजारो भाविकांना व्यसनमुक्ती, सदाचार, लोककल्याण यांचा मार्ग दाखवला. यामुळेच कालीदास महाराजांच्या निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >