Sunday, July 19, 2026

Kalyan Crime : कल्याणमधील ‘पेंद्या भाई’ हत्येचा 36 तासांत उलगडा; तिघांना अटक, एक आरोपी फरार

Kalyan Crime : कल्याणमधील ‘पेंद्या भाई’ हत्येचा 36 तासांत उलगडा; तिघांना अटक, एक आरोपी फरार
कल्याण : कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात झालेल्या अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ यांच्या हत्येचा कल्याण गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. (kalyan Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन काळपांडे यांच्यावर त्यांच्या प्रेयसीसमोर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मध्ये पडण्याचा प्रयत्न करणारी त्यांची प्रेयसीही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. (Pendya Bhai Murder) या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन काळपांडे (Arjun Kalpande) काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आले होते. येत्या काही महिन्यांत त्यांचा विवाह होणार असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
घटनेचा तपास सुरू असताना पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने स्वतंत्र तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. या प्रकरणात अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड या तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा पोलिसांचा दावा आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी मानपाडा (Manpada) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हत्येमागील नेमके कारण, आरोपींमधील जुने वाद आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >