Wednesday, July 15, 2026

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असून, डॉक्टरांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

'व्हायरल कॉकटेल'ची स्थिती

तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या पावसाळ्यात एक नव्हे, तर तीन विषाणूंचा धोका एकत्र उद्भवला आहे. पावसाळ्यात नागरिक बंदिस्त ठिकाणी अधिक वेळ घालवत असल्याने, हवेद्वारे आणि थेंबांद्वारे या विषाणूंचा प्रसार वेगाने होत आहे. या परिस्थितीला तज्ज्ञांनी ‘व्हायरल कॉकटेल’ असे संबोधले आहे.

प्रमुख लक्षणे

या तिन्ही आजारांची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने नेमका कोणता संसर्ग झाला आहे, हे ओळखणे कठीण होत आहे. खालील लक्षणे आढळल्यास सावध राहणे गरजेचे आहे:

  • ताप आणि सतत खोकला

  • घसा दुखणे किंवा खवखवणे

  • अंगदुखी आणि तीव्र डोकेदुखी

  • अशक्तपणा

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • काही रुग्णांमध्ये अतिसार

कुणाला आहे सर्वाधिक धोका?

सध्या बहुतेक रुग्णांमध्ये हे संसर्ग सौम्य स्वरूपाचे असले, तरी खालील 'हाय-रिस्क' गटातील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे:

  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक.

  • मधुमेह, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार असलेले रुग्ण.

  • कर्करोगग्रस्त रुग्ण किंवा अवयव प्रत्यारोपण झालेले व्यक्ती.

  • प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेणारे रुग्ण.

डॉक्टरांचा सल्ला आणि खबरदारी

तज्ज्ञ डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:

१. स्वतःहून औषधोपचार टाळा: विषाणूजन्य संसर्गावर अँटीबायोटिक्सचा काहीही उपयोग होत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही अँटीबायोटिक्स घेऊ नका, कारण त्याचा शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो.

२. वेळेवर तपासणी: लक्षणे ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकून असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि गरज पडल्यास प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.

३. साध्या सवयी, मोठा बचाव: गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, वारंवार हात धुवा, बंद खोल्यांमध्ये पुरेशी खेळती हवा ठेवा आणि लसीकरण पूर्ण करा.

४. विश्रांती: आजारी असताना कामावर न जाता घरीच विश्रांती घ्या, जेणेकरून संसर्गाची साखळी खंडित होईल.

तज्ज्ञांच्या मते, वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास या संसर्गाचा धोका सहजपणे टाळता येऊ शकतो, त्यामुळे घाबरून न जाता जागरूक राहणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >