दोन महिन्यांत ६३ कोटींचा दंड वसूल
मुंबई : मागील काही दिवसांपासून रेल्वेने विनातिकीट (Without Ticket) प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये जनरलचे तिकीट काढून स्लीपर तसेच एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. विनातिकीट प्रवाशांमुळे मध्य रेल्वेचे (Central Railway) उत्पन्न देखील घटल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेने कोटींचा गल्ला जमवला आहे. (Without Ticket Fine)
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रेल्वेस्थानक तसेच प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष तिकीट तपासणी मोहिम सुरू आहे. मागील दोन महिन्यात रेल्वेने ९ लाख फुकटे प्रवासी पकडले आहेत. त्यांच्याकडून तब्बल ६३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणादणले आहेत.
यामध्ये ४.०७ लाख प्रवासी एकट्या मुंबई विभागातील आहेत. तर भुसावळ विभागात १.९३ लाख विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर विभागातील १.१९ लाख, सोलापूर विभागातील ५४.०७ हजार आणि पुणे विभागातील ८३.१० हजार हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रवाशांकडून एकूण ६३.६२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.