जाणून घ्या नेमकं कारण काय
पुणे : काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा राज्यात उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. अशातच राज्यभरातील अनेक भागातील नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाळा जवळ येताच महापालिकेतर्फे उड्डाणपूल बांधणे, जलवाहिनी तसेच विद्युतविषयक कामांवर जोर दिला जातो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अशातच पुणे शहरातही देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती घेतली असून संपूर्ण पुण्यात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच पुणेकरांना पाणी जपून वापरा असे कडक आवाहनही करण्यात आले आहे.
पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टाकी परिसर, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) टाकी परिसर व चतुःश्रृंगी टाकी परिसर तसेच लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.
दरम्यान, पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, ‘पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन केले असल्याने शुक्रवारी अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही’, असे म्हटले आहे.