Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलपितृ देवो भव:

पितृ देवो भव:

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

बाप नावाचा ‘बापमाणूस’ धरणीला माय, भारतदेशाला माता आणि जननीला जगन्माता म्हटलं जातं. त्याच जोडीने आयुष्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांना वडील, पिता म्हटलं जातं. ‘तात’ म्हणजे बाप. जे आपल्या पाल्याला बोट धरून कडेवर, खांद्यावर नाचविणारे, चालायला, बोलायला, शिकवणारे ते तेच हात असतात. जेव्हा शाळेत प्रगती पुस्तकावरून लाल शेरे पाहिले की, डोळ्यांत अंगार उभे करतात. आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा. चांगली संगत धरावी. त्यांच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडाव्यात. त्यांची मैत्री, प्रेमाचे, स्नेह चांगल्या घरात जोडले जावेत, त्यांचं भलं व्हावं, असं हे प्रत्येक बापालाही वाटतं. आपली फुशारकी, आपला बडीजाव, मोठेपणा, अभिमान तो मुलांत शोधत असतो. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्नं बाप मुलांमध्ये शोधत असतो. आपले जीवनविश्व, आपली जीवन आलेख तो मुलांमध्ये शोधत असतो आणि या लेकरांसाठी आनंदाने खूप साऱ्या गोष्टी सातत्याने करून मुले शहाणी व्हावीत म्हणून वेड्यासारखं वागतो, तो बाप असतो.

आईसाठी लाखो कवींनी लिहिले सारे. पण कायमचा दुर्लक्षित असलेला बाप म्हणजे कौतुक, प्रोत्साहन देत, खांद्यावर हात टाकणारा ‘मित्र’ असतो. आपल्यात कटाक्षाने सुधारणा करणारा कट्टर ‘निंदक’ असतो. आपल्याला पुढे नेणारा तो ‘नेता’ असतो. आपल्यावर निरपेक्ष, निर्व्याज प्रेम करणारा तो ‘वटवृक्ष’ असतो. आपलं हित जाणून जीवापाड काळजी करणारा बाप, आपल्या मनातलं जाणून हवं, नको ते न मागताही देणारा ‘कल्पवृक्ष’ असतो. वडीलकीच्या नात्याने पावलोपावली जपणारा, बाप ‘बापच’ असतो. ‘बाप’ म्हणजे तुफानातला ‘दिवा’ असतो. आपल्या लेकराच्या जीवनात अंधारातही ‘दीपस्तंभ’ असतो. आहे तोवर गच्च मिठी मारून घ्या. भरभरून जगून घ्या. त्यांच्यासमवेत मनभरून जीवनप्रवासात, सहवासात निघून गेल्यावर मात्र फक्त त्याचा फोटो आणि मोबाइलमधील नंबरच राहतो.

ज्ञान, शांती, कर्माचा सुसंस्कृत ठेवा म्हणजे बाप असतो. कर्तव्य, जबाबदारी आणि संयम म्हणजे बाप असतो. आई- बापाची मान उंचवावी असे मुलांनी जगावे आणि आणि आई-बाबांचेही हेच मागणे असावे. घरातला कर्ता पुरुष खूप साऱ्या गोष्टी घरात सगळ्यांसाठी करणं, जपणं हे बापच करत असतो. दुसरा-तिसरा कोणी नसून बापच. स्वाभिमानासाठी कमावलेला, अभिमानाने जपलेलं आणि कर्तृत्व म्हणून न करता जबाबदारी पेलेलं एक व्यक्तिमत्त्व. ऑफिसची वेळ, आवड, शिस्त, जरब, जीवन, सुखदुःखे, आजारपण, कर्तव्यनिष्ठा, निवृत्ती आणि नंतर निधन. या सगळ्या टप्प्यांवर आज पाहिलं, तर बाप माणसाची कहाणी आभाळाएवढी होईल. एखादं गणित सुटलं नाही म्हणून मिळालेले धपाटे आयुष्याची कोडी सोडवायला उपयोगी पडली. संसाराच्या रामारेटात दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद द्यावा, ही शिदोरी त्यांनीच दिली आणि जगात आपल्या आधी सर्वांचा विचार करावा ही नि:स्वार्थ भावना, सहकार्य, परोपकार हे आवर्जून सांगणारे बाप घराघरात असतो.

ते आहेत तोवर करा सण, उत्सव, वाढदिवस साजरा. पण नंतर मात्र मोबाइलमध्ये सेव केलेला नंबरच मात्र तसाच राहील आठवणीत आणि डोळ्यांच्या अश्रूंमध्ये पण भेटतील का हो? डायल केल्यावर तुम्हाला तुमचे हिमालयाएवढा जन्मदाता, आभाळाएवढा पिता, उदंड छाया, छत्र स्मरण करा ज्यांचे नाहीत पिता त्यांनीही आणि कदर करा त्यांचे आहेत त्या सर्वांनी! जगाच्या स्पर्धेत आपली मुले शहाणी व्हावीत म्हणून वेड्यासारखं वागणारा बाप, तोच प्रचंड कष्ट करणारा, घामाच्या धारांनी भिजणारा, काबाड कष्ट, काळजी वाहणारा असतो. आईसारखी त्यालाही माया, ओढ जिव्हाळा, भावना असतात. तो पण फक्त फरक इतकाच की, आडवा येतो पुरुषी अहंकार आणि ते दाखवत नाही. कारण आपण पायाला ठेच लागली की आई गं! म्हणतो आणि साप दिसला की बापरे! असंच म्हणतो ना; बाप म्हणजे काय ते यांना विचारा. ज्यांना बापाचा सहवास मिळाला नाही. त्यांना कमनशिबी म्हणावे लागेल. एक तर बापाशिवाय घर म्हणजे अर्धवट आयुष्य, जसे कळसाशिवाय मंदिर, आई आईच असते म्हटलं तरी… आईला काही काही दिलं तरी बाप कसा देऊ शकणार? त्यामुळे ज्यांना काही कारणास्तव बाप नसेल, त्यांना बापाची उणीव कोणीही पूर्तता, रिक्त जागा पूर्ण करू शकणार नाही.

बाप म्हणजे शिस्तीचे कुंपण घालणारा. अख्ख जीवनभर साथ-सोबत देणारा. पाठीवर शाबासकीची थाप देणारा. वेळेला कठोर संस्कारांची शिदोरी, आठवणीतील गाणी होणारा बाप. बाप असलेल्यांनी वृद्धाश्रमात पाठवू नका, पण नसलेल्यांना नक्की विचारा की, ज्यांच्या नशिबात जर बापाची माया, सहवास प्रेम नसेल त्याला बापाच्या प्रेमाची किंमत विचारा! शाळेत नावापुरता नावाच्यामध्ये असलेला बाप पेरेंट्स मीटिंगला, सहलीला, गॅदरिंगला समवेत नसेल, तर त्या चिमुरड्या बालमनाची इवल्याशा जीवाची घालमेल? इतरांच्या, मित्रांच्या तुलनात्मक परिस्थितीत सामोरे जाताना बालमनाची एकूणच काय अवस्था होत असेल? मानवी जीवनात प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या वळणावर जगताना! कारण संसाररथाची दोन चाके असतात, आई आणि बाप. त्या रथाचे एक चाक नसेल, तर विचारा या गोष्टीचे महत्त्व त्यालाच ज्याला या गोष्टीची उणीव असेल! म्हणूनच प्रत्येक वळणावर बाप अत्यंत मोलाचा असतो. आई जर कलाकार, तर पडद्यामागील किमयागार बाप असतो बाप म्हणजे संयम, शांती, कृती बाप म्हणजे त्याग,सहिष्णुता, संस्कार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -