देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर बोचरी टीका
छत्रपती संभाजीनगर : देशभरात निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत निवडणुकीचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. आता निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याला वेग आला असून सर्व नेते आपल्या प्रचारात गुंतलेले आहेत. अशाच प्रचार सभांच्या दरम्यान बडे बडे नेते विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) छत्रपती संभाजीनगरमधून विरोधकांवर चांगलाच टोला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना, उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात, हे मला माहीत नाही. पण मी उद्धवजी यांना चांगलं ओळखलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांचा मार्गदर्शक शरद पवार आहेत. त्यामुळे पवार साहेब (Sharad Pawar) जे म्हणतील तेच उद्धवजी करतात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
उद्धवजी आणि संजय राऊत यांचा मानसिक बॅलन्स गेला आहे
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आणि संजय राऊत यांचा मानसिक बॅलन्स गेलेला आहे. त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाला दाखवावं. त्यांची मदत घ्यावी. त्यांच्या लक्षात आलंय की, जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे. म्हणून ते आता शिवीगाळ करण्यावर उतरलेले आहेत. त्यांचं खरोखर मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.