पोलीस आणि मतदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
सांगली : देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. काही ठिकाणचे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. मात्र सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदान केंद्रावर एक अजब प्रकार उघडकीस झाला आहे. सांगलीत लोकसभा मतदानावेळी बनावट मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या मतदानादिवशी सांगली शहरातील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे खोटे मतदान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला असून या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
सांगली मतदान केंद्रावर नेमकं घडलं काय?
मतदानासाठी चार महिला मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. परंतु, यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र संबंधित महिलांनी आम्ही मतदान केलंच नाही, तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं? असा जाब विचारला. त्यावर, तुमच्या नावाचे मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. आता याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.