मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले. या विजयासह हैदराबादचे १४ अंक झाले आहेत तर पॉईंट्स टेबलमध्ये ते राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. हैदराबादने १६६ धावांचे आव्हान १०.२ षटकांत बिनबाद पूर्ण केले. हैदराबादचे १४ गुण झाले आहेत तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी १६ गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १४ मेला टक्कर होईल. यातील एका संघाचे कमीत कमी १३ गुण होतील. मुंबई इंडियन्स बाकी आपले दोन सामने जिंकून जास्तीत जास्त १२ गुण मिळवेल. मात्र टॉप ४ साठीही इतके गुण पुरेसे नाहीत.
मुंबई इंडियन्सची हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सुरूवात खराब राहिली. त्यांना सुरूवातीला सलग ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरच्या पुढील ४ सामन्यांपैकी ते तीन सामने जिंकले. मात्र त्यानंतर पुन्हा ४ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. यामुळे प्लेऑफमध्ये त्यांच्या खेळण्याच्या आशा मावळल्या आहेत.
मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट मिळवल्या. बुमराहने १२ सामन्यात १८ विकेट घेतल्या. यात इकॉनॉमी रेट ६.२० इतका होता. यानंतर मुंबईच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. त्यांच्या फलंदाजांची कामगिरी खराब राहिली. मुंबईचा एकही फलंदाज १२ डावांमध्ये ४००हून अधिक धावांचा आकडा पार करू शकला नाही. तिलक वर्माने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३८४ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ९ डावांत ३३४ धावा केल्या. रोहित शर्माने १२ डावांत ३३० धावा केल्या.