पुणे : हवामान विभागाने गेल्या तीन दिवसांपासून कोकणात दिलेले अतिवृष्टीचे इशारे फोल ठरले आहेत. रविवारी मान्सूनने न बरसताच अवघे राज्य व्यापल्याची घोषणा हवामान विभागाने केली. अतिवृष्टीचे इशारे देऊनही मान्सून गायब असून उकाड्याने नागरिकांची काहिली होत आहे.
हवामान विभागाने २० जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले होते. यात कोकणात अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज दिला होता. मात्र तीन दिवस उलटून गेले, तरी त्या अंदाजानुसार मान्सून पडलाच नाही. उलट सगळीकडे चक्क कडक ऊन अजूनही पडत आहे. रविवारी राज्यातील बहुतांश भागांत कडक ऊन होते. सोमवारी देखिल हीच परिस्थिती सगळीकडे दिसून येते. उन्हामुळे पुन्हा घराघरांत पंखे, कुलर अन् एअर कंडिशनर सुरू झाले आहेत. अस्वस्थ करणाऱ्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात वादळी वारे ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वाहत आहे. मात्र कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात खंडित स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. यात शनिवारी कोकणाला रेड, तर रविवार ते सोमवार ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तेवढा पाऊसच पडला नाही. उर्वरित राज्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. काही हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा जूनमधील पाऊस हा खंडित स्वरूपाचा असून, हवेचा दाब असमान असल्याने तो कमी-जास्त प्रमाणात पडत आहे.
संपूर्ण अहवाल येथे पहा…
हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. समुद्र आणि महासागरावर जर हवेचा दाब १००७ ते १००८ हेक्टापास्कल इतका असेल, तर बाष्पयुक्त वाऱ्याचे वहन होण्यासाठी तो दाब १००३ ते १००४ इतका व्हावा लागतो. तेव्हाच बाष्प कमी दाबाच्या क्षेत्राकडे येतील. पण यंदा जूनअखेरपर्यंत खंडित पावसाचीच शक्यता दिसत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस जोर धरेल असे वाटते. कारण तोवर दाब कमी होईल असा अंदाज आहे, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.