Friday, May 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजCrime : मोबाइल ते बालसुधारगृह

Crime : मोबाइल ते बालसुधारगृह

  • क्राइम : अॅड. रिया करंजकर

लॉकडाऊनच्या काळात सर्रासपणे अल्पवयीन मुलं मोबाइल वापरू लागले आणि ज्या गोष्टी त्यांना समजू नये त्या गोष्टी त्यांना समजू लागल्या. आई-वडिलांना वाटायचं की मुलं मोबाइलवर अभ्यास करतात. पण आई-वडिलांना फसवून अभ्यासाच्या नावावर ही मुलं भलत्याच गोष्टी मोबाइलमध्ये बघत होती…

माणसांच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा अशा पूर्वपार चालत आलेल्या आहेत. आता आधुनिक काळानुसार त्यामध्ये आधुनिक गरज म्हणजे मोबाइल हेसुद्धा गरजेचे झाले आहे, असं म्हणावे लागेल. मूल जन्माला आलं की, आई-वडील मूल शांत राहण्यासाठी त्याला मोबाइल दाखवतात व त्यापासून त्या मुलाला मोबाइलची सवय होऊन जाते. जेवताना, गप्प राहण्यासाठी मोबाइल असं नको त्या गोष्टींसाठी मुलांच्या हातात मोबाइल दिला जातो. त्या मुलांना मोबाइल म्हणजे काय हेसुद्धा व्यवस्थित कळलेलं नसतं आणि ज्यावेळी ही मुलं त्या मोबाइलवर काही बघत असतात किंवा खेळत असतात आणि त्याच वेळी पालकांचा जर फोन आला आणि पालकांनी तो फोन उचलला, तर ही मुलं अशी धिंगाणा घालतात, संपूर्ण घर डोक्यावर घेतात.

आज-काल आई-वडिलांसोबत ६-७ महिन्यांच्या मुलालाही वेगळा मोबाइल दिला जातो. खेळ पण गप्प बस ही आजकालची पालकांची विचारधारणा झालेली आहे. शाळेमध्ये मोबाइल अलाऊड नव्हता जो चुकून मुलाने मोबाइल आणला, तर त्याला योग्य अशी शिक्षा केली जात होती; परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये ही शाळा मोबाइलमध्ये ऑनलाइन पद्धतीने भरवण्यात आली होती. ज्या शाळेमध्ये मोबाइल अलाऊड नव्हता, ती शाळा आता मोबाइलमध्ये घेतली जात होती. याच लॉकडाऊनच्या काळात सर्रासपणे अल्पवयीन मुलं मोबाइल वापरू लागले आणि ज्या गोष्टी त्यांना समजू नये त्या गोष्टी त्यांना समजू लागल्या. आई-वडिलांना वाटायचं की मुलं मोबाइलवर अभ्यास करतात. पण आई-वडिलांना फसवून अभ्यासाच्या नावावर ही मुलं भलत्याच गोष्टी मोबाइलमध्ये बघत होती.

दोन-तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेश येथील गोंडा गावामध्ये घडलेली आहे. आरोपींचे वय आठ वर्षे आणि दहा वर्षे असे दोन आरोपी आहेत. हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. यांनी शाळेतील एका पाच वर्षे वयाच्या मुलीवर मधल्या सुट्टीमध्ये तिला आडोशाला नेत त्या दोघा आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्या दोन्ही आरोपी मुलाने आम्ही या मुलीवर अतिप्रसंग केला, हे कबूल केलं. ज्या मुलीवर हा प्रसंग घडला त्या मुलीला हे काय चाललं आहे, तेही कळण्याची तिला बुद्धी नव्हती. दोन आरोपी जे आहेत त्यांना आपण काय करतो आहोत याची बुद्धी नव्हती. एका लहान मुलीचं आयुष्य या अल्पविराम आरोपींनी बरबाद केलं. आपलं आयुष्य बरबाद झाले याची कल्पनाही त्या मुलीला नाही. आपण केवढा मोठा गुन्हा केलेला आहे याची जाणीवही त्या आरोपी मुलांना नाही. ज्यावेळी त्या मुलांना तुम्ही असं का केलं? हा प्रश्न विचारला गेला, त्यावेळी त्यांनी आम्ही मोबाइलमध्ये असं बघितलं होतं म्हणून आम्ही केलं, असे त्या मुलांनी निरागसपणे उत्तर दिलं. म्हणजे या मोबाइलमुळे जी मुलं अंड्यातून बाहेर पडलेली नाहीत, ती मुलं अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करू लागलेली आहे. आपण जे करतोय ते किती भयानक आहे याची जाणीव या मुलांना नाही. फक्त एखादी गोष्ट बघितली आणि तसं करण्याचा प्रयत्न केला एवढेच त्यांना समजतंय. मोबाइलच्या अतिवापरामुळे एका मुलीचे आयुष्य बरबाद झाले आणि अल्पवयीन मुलं आरोपी झाले.

आपली मुलं मोबाइलवर काय बघतात, आपली मुलं मोबाइल किती वापरतात यावर पालकांचे नियंत्रण असलं पाहिजे. मुलांना मोबाइल देताना काही ॲप बंद केले गेले पाहिजेत. लॉकडाऊन संपलेला आहे, शाळाही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे शाळेने ही मोबाइलमधून ऑनलाइन अभ्यास घेणे आता कायमस्वरूपी बंद केलं पाहिजे. आपली मुलं कोणत्या मित्राकडे जातात, वेळ घालवतात, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या मुलांना दुसऱ्या मुलांच्या घरी पाठवणं बंद केलं पाहिजे. अभ्यासाला जातो म्हणून सांगून ही मुलं मोबाइलवर भलत्याच गोष्टी बघत असतील, याची जराही कल्पना पालकांना नसते. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या प्रसंगामुळे ती दोन्ही मुलं म्हणजे आरोपी आज बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. लहान वयातच ही मुलं गुन्हेगार ठरलेली आहेत. त्यांना साधा गुन्हेगार शब्दाचा अर्थ माहीत नाही. पण मोबाइलमुळे त्यांना गुन्हेगारी जगामध्ये खेचलं गेलेलं आहे.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -