Tuesday, June 25, 2024
Homeदेशकाँग्रेसचे सरकार सात जन्मात येणार नाही

काँग्रेसचे सरकार सात जन्मात येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले ठाम मत

हरियाणा : “काँग्रेसचे सरकार सात जन्मातही येणार नाही. काँग्रेसला दिलेले प्रत्येक मत वाया जाईल” असे म्हणत टीकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचारासाठी हरियाणातील महेंद्रगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.”काँग्रेसने देशाची फाळणी केली. त्यांनी एक भारत,दोन मुस्लिम राष्ट्रे निर्माण केली आणि आता उरलेल्या भारतावरही मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे इंडिया आघाडीतील लोक म्हणत आहेत. ते आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे मोदी यावेळी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले की, “रॅलीतील गर्दी आणि उत्साह हे स्पष्टपणे दर्शविते की काँग्रेसची इंडिया आघाडी ही पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण देश एकच गोष्ट म्हणत आहे, पुन्हा एकदा मोदी सरकार. काल मी एक व्हिडीओ पाहत होतो, ज्यामध्ये लोक स्टेजवर धावत आणि चढत होते.” “व्हिडीओ पाहून मी विचारलं, हा गोंधळ का सुरू आहे? तर त्यांनी सांगितलं की, काँग्रेसचे लोक रॅलीत लोकांना आणण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात. प्रति व्यक्ती पैसे देतात, पण त्यांनी पैसे दिले नाहीत, म्हणून लोक धावत येऊन स्टेजवर चढले. आता अशी स्थिती असलेला पक्ष तुमचं भले कसे करू शकेल?” असेही मोदी यावेळी म्हणाले.

इंडिया आघाडीवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, “गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी इंडिया आघाडीतील लोकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. पाच वर्षांत पाच पंतप्रधान होतील, असे सांगितले जात आहे. पाच वर्षात पाच पंतप्रधान, हरियाणाचे लोक पाच हजार विनोद बनवतील. इंडिया आघाडीचे लोक अत्यंत जातीयवादी, घराणेशाहीवाले आहेत.”

“मला राजकारणाची समज हरियाणा आणि पंजाबमधूनही मिळाली. मी हरियाणामध्ये १९९५ मध्ये आलो. मी येथील माता-भगिनींच्या हातचे अन्न खाल्ले आहे. आता मोदींना तुमचे हे कर्ज फेडण्यासाठी खूप काम करायचे आहे. आपल्या हरियाणाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. यासाठीच पुन्हा एकदा मोदी सरकार गरजेचे आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -