हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढला आहे. पहाटेपासून हजेरी लावलेल्या पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले आहे. पहिल्याच पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली असली तरीही नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाकडून (IMD) पुढील काही दिवस मुंबईकरांचा दिलासा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
या भागांत पावसाची शक्यता
कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट
भारतीय हवामान खात्याने सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. अंदाजनुसार ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागाने दिला आहे.