मुंबई : अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांसोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे दक्षिण मुंबईतील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. गेली अनेक वर्षे त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या.
मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आशा यांचे २९ जून रोजी निधन झाल्याची बातमी त्यांच्या मुलाने माध्यमांना दिली. निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. यासोबतच चाहतेही पोस्ट करून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
आशा नाडकर्णी यांचा जन्म सारस्वत कॉलनीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९५७ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आशा एक उत्तम नृत्यांगनाही होत्या.
अवघ्या १५ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात केले पदार्पण
आशा यांनी ‘मौसी’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यावेळी त्या अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. १९५७ ते १९७३ या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले. नवरंग, दिल और मोहब्बत, क्षण आला भाग्याचा, फरिश्ता, गुरु और चेला आदी आशाजींचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
आशा नाडकर्णी यांचे लोकप्रिय चित्रपट
आशा नाडकर्णी यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम करून लोकांची मने जिंकली आहेत. या यादीत नवरंग (1959), गुरु और चेला (1973), चिराग (1969), फरिश्ता (1968), श्रीमानजी (1968), दिल और मोहब्बत (1968), अलबेला मस्ताना (1967), बेगुनाह (1970), श्री बाळासाहेब (1964), क्षण आला भाग्याचा (1962) आणि मनाला ते देव (1970)यांचा समावेश आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra