केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मोठा दावा
ओडिशा : देशात २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठाच दावा केला आहे. ते म्हणाले, ‘पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत.
ओडिशमध्ये आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी हा दावा केला आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचे देशात आणखी दोन टप्पे शिल्लक असून सहाव्या आणि सातव्या फेरीच्या मतदानानंतर आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असेही शहा यांनी म्हटले आहे.
दरम्यान सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, यावेळी ओडिशात कमळ फुलणार आहे. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून उमेदवारी दिली आहे.
राज्यात (ओडिशात ) मूठभर अधिकाऱ्यांची सत्ता असल्याचा आरोप अमित शहा यांनी यावेळी केला. या निवडणुकीमुळे राज्यातील सध्याचे बाबूराज संपणार असल्याचे ते म्हणाले, देशातील बहुतांश खाणी आणि खनिज साठे केओंझार जिल्ह्यात असूनही येथील आदिवासींना कोणताही लाभ मिळालेला नाही.
या पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, ‘काँग्रेसने आदिवासींसाठी काहीही केले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आदिवासीची प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले होते, तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात नक्षलवाद संपवण्याचे काम केले आहे.
‘‘मोदींनी डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन स्थापन करून आदिवासी भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचे सांगुन शहा म्हणाले, मोदी सरकारच्या काळात आदिवासींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद १.२५ लाख कोटी रुपये करण्यात आली होती. तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात फक्त २५ हजार कोटी रुपये इतकीच तरतूद होती.‘