अंधेरी सबवे बंद; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबई : आज सकाळपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस (Rain updates) सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या एलबीएस मार्गावरील वाहतुकही मोठ्या प्रमाणावर मंदावलेली पहायला मिळाली.
अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या कामामुळे ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि ठाण्यासह नवी मुंबई कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ बदलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस हा पडत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये रात्रभर पाऊस कोसळत होता. सकाळी तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.