वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील दाभोन गावच्या विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागत असून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दाभोन गावाला जाणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून बनवला नाही, तर या वर्षी रस्त्याच्या कडेला केलेल्या माती भरावामुळे चिखल तयार झाला आहे.
चारचाकी वाहन तर जातच नाही. पण दुचाकीसुद्धा घसरून पडण्याचे प्रकार नेहमीच पाहायला मिळतात. दरम्यान चढावावर बस न चढल्याने ब्रेक मारले, तर ती घसरून खाली येणे, असे प्रकार झाल्याने बस सेवासुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना व शाळेतून येताना पाच-पाच किलोमीटरचा प्रवास चिखलातून करावा लागत आहे.
वेळेचे नुकसान होत आहे, तर पायपीटही करावी लागत असल्याने विद्यार्थी व गावकरी त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात बस चालू शकतील, असा तात्पुरता रस्ता तरी व्हावा एवढीच माफक अपेक्षा असल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.