अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील मूनवली येथील तलावात रविवारी २३ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास दोन मुलांचा पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मूनवली पंचक्रोशीतील 8 मुलांचा ग्रुप मूनवली येथे वर्षासहलीसाठी आला होता. त्यातील अथर्व शंकर हाके (वय अंदाजे १६ वर्षे) व शुभम विजय बाला (वय अंदाजे १५ वर्षे) हे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोक धाऊन आले. पण त्या मुलांना वाचवू शकले नाहीत. या घटनेची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वांनी मुनवली तलावाकडे धाव घेतली.
सुरुवातीला पट्टीच्या पोहणाऱ्यांनी अथर्वा आणि शुभम यांना तलावात शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातील अर्थवचा मृतदेह प्रथम हाती लागला, तर शुभमचा थोड्या उशिराने मृतदेह हाती लागला.या घटनेने मूनवलीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. हाके आणि बाली कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. अर्थव हाके हा मुनवली गावचा राहणारा, तर शुभम बाली हा तुडाल येथे राहत होता. शुभमचे पालक हे मोलमजुरी करीत असल्याचे समजते. याबाबत अलिबाग पोलिसांत नोंद झाली आहे.