प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला संताप
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात युतीच्या चर्चा झाल्या होत्या. परंतु काही कारणास्तव ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही व वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचा वंचितला फटका बसला, तर मविआने मात्र ३० जागा जिंकल्या. त्याबद्दल उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. मात्र, ठाकरेंच्या या भूमिकेवरुन प्रकाश आंबेडकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनी दलित व बौद्धांचे कुठेच आभार न मानल्याने प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे म्हणजे ‘गरज सरो वैद्य मरो’चं उत्तम उदाहरण असा जळजळीत टोलाही त्यांनी लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’चं उत्तम उदाहरण. उच्चवर्णीय हिंदूंनी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी उबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.