Sunday, June 22, 2025

Nitin Gadkari : खराब रस्त्यांवर प्रवाशांनी टोल का भरावा?

Nitin Gadkari : खराब रस्त्यांवर प्रवाशांनी टोल का भरावा?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली नाराजी


मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात बोलताना देशभरातील खराब रस्त्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच टोल (Toll) नाक्यांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. रस्त्यांबाबत जर चांगल्या सुविधा दिल्या जात नसतील तर प्रवाशांनी टोल का भरावा. आणि लोकांना टोल का आकारला जावा, असा प्रश्न यावेळी गडकरी यांनी उपस्थित केला.


सॅटेलाईट बेस्ड टोलिंगवर आयोजित वर्कशॉपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते टोल टॅक्सबाबत मोकळेपणाने बोलल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, जर चांगले रस्ते आणि सेवा दिली जात नसेल तर टोल वसूल करणे चुकीचे आहे. तसेच, खराब रस्त्यांवर प्रवाशांना टोल भरायला लावणे एकदम चुकीचे आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यावेळी गडकरी यांनी टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रांगांबाबत देखिल चिंता व्यक्त केली.


सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत (NHAI) नव्या व्यवस्थेअंतर्गत टोल गेट्स हटवण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की, जेव्हा कोणत्या रस्त्याची स्थिती चांगली नसते तेव्हा मला त्याच्या तक्रारी मिळत असतात. अनेक जण सोशल मिडियावर मला टॅग करून यासंदर्भात कळवत असतात, असे गडकरी यावेळी म्हणाले.


ज्या ठिकाणी खूप चांगले रस्ते बनत आहेत, त्याठिकाणी प्रवाशांनी शुल्क द्यायला हवा. जर तुम्ही खड्डे आणि चिखलाच्या रस्त्यासाठी देखील पैसे आकारत असाल तर ते चुकीचे आहे. तुम्ही असे करत असाल तर लोक नक्कीच नाराज होतील आणि त्यांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागेल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.


टोल नाक्यावर रांगेत उभे राहणाऱ्या लोकांचे दु:ख राष्ट्रीय राजमार्ग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. तसेच, तक्रार दाखल करणे आणि त्याचे निवारण करणे याच्यातील वेळ कमी व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे मेकॅनिझम तयार केले गेले पाहिजे, अशा सुचनाही गडकरी यांनी यावेळी केल्या.

Comments
Add Comment