शैशवातच मातृछत्र हरवलेलं. वडील तमाशात तबलजी. आर्थिक स्थिती अशी की, एकवेळचं जेवण मिळणं दुरापास्त. केर-वारा, धुणी-भांडी, असं पडेल ते काम करून तळहातावरच जीवन जगणाऱ्या दत्ताचं स्वप्न होतं अभियंता बनण्याचं. तल्लख बुद्धी उपजतच लाभलेली. इंग्लंडच्या मॅकॅनो कंपनीनं घेतलेल्या इलेक्ट्रिक सर्किट बनविण्याच्या स्पर्धेत अवघ्या सातव्या वर्षी ५० पौंडांचं प्रथम पारितोषिक पटकावलेलं. परिस्थितीमुळे शिक्षण कधीच थांबलेलं. मात्र नियतीच्या शाळेत आणि परीक्षेत दत्तानं नाव काढलं. अभियंता होऊन मानवनिर्मित यंत्रांच्या जगात रममाण होण्याची महत्त्वाकांक्षा असलेला हा तरुण ईश्वरनिर्मित स्वर यंत्रांचा पारखी ठरला. गायन विश्वात आपली अमिट छाप उमटविणाऱ्या एक-दोन नव्हे तर, सप्तसुरांना हेरून त्यांना पहिली संधी देऊन दत्ता डावजेकर यांनी समस्त संगीत रसिकांवर अनंत ऋण करून ठेवलं आहे.
एका पोरसवदा मुलीची ऑडिशन घेण्यास डीडी यांना सांगण्यात आलं. (याच लघुनामाने ते ओळखले जात.) उत्तम नीरक्षीर विवेक असलेल्या त्यांनी, क्षणाचाही विलंब न लावता मास्टर विनायक यांच्याकडे तिची आग्रही शिफारस केली. ती मुलगी होती लता मंगेशकर. दीदींचं हिंदीतील पहिलं गाणं ‘पा लागू कर जोरी’ चित्रपट ‘आपकी सेवा में’ आणि मराठीतील पहिलं गाणं ‘चला चला नवबाला’ चित्रपट ‘माझं बाळ.’ या दोन्ही चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन डीडींनी केलं आहे. केवळ लता मंगेशकरच नव्हे, तर डॉक्टर वसंतराव देशपांडे, आशा भोसले, माणिक वर्मा, उषा मंगेशकर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल या भविष्यात दिग्गज ठरलेल्या सप्तस्वरांना प्रथम ‘चाल’ दिली, ती काळाच्या पुढं असलेल्या दत्ता डावजेकर या संगीतकारांनी. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक पंडित वसंतराव देशपांडे यांना डीडींनी ‘झांजीबार झांजीबार’ या गीताने पहिला ब्रेक दिला.
‘गोमू माहेरला जाते रे नांखवा’ हे सर्वकालिन लोकप्रिय ठरलेलं गीत गाण्यासाठी जितेंद्र अभिषेकी यांना डीडीनींच प्रोत्साहित केलं होतं. माणिक वर्मा यांची एचएमव्हींनी काढलेली पहिली ध्वनिमुद्रिका ही डीडी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली निघाली होती. इतकंच नाही तर हिंदी चित्रपटांचा खलनायकी अभिनेता प्रेमनाथकडूनही डीडींनी गीत गाऊन घेतलं. चित्रपट होता ‘गोवळकोंडा का कैदी.’ सुरांप्रमाणेच तंत्राशी ही सलगी असल्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या निर्मितीतही त्यांनी हात आजमावला. भारतातला पहिला इलेक्ट्रॉनिक सिंथेसायझर, ही त्यांचीच देण.
सुरेशबाबू माने आणि अनिल विश्वास यांना गुरुस्थानी मानत असले तरी डीडी यांनी संगीताचं शिक्षण असं घेतलं नव्हतं. तमाशा आणि उर्दू नाटकांत तबला वाजवणाऱ्या वडिलांची सतत सोबत लाभलेल्या डावजेकरांचा तबला, पेटीवर हात बसला. दिलरुबा, जलतरंग, ग्लॉक्स, क्ले व्हायोलिन, पियानो, सिंथेसायझर ही वाद्येही ते सफाईदारपणे वाजवत.
ते चालीही बांधू लागले. डीडींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वरलिपी लेखनातलं प्रावीण्य. या कौशल्यामुळे त्यांना एस. एन. त्रिपाठी, चित्रगुप्त, सी. रामचंद्र, रोशन, मास्टर कृष्णराव अशा दर्जेदार संगीतकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनेक गीतांचं संगीत संयोजन करून ती अजरामर करण्यात डीडींचं मोठं योगदान आहे. सी. रामचंद्र यांच्या ‘अनारकली’ चित्रपटातल्या सुप्रसिद्ध ‘जाग दर्द-ए-इश्क जाग’ या गीताचं संपूर्ण संगीत दिग्दर्शन डीडींचं आहे. तसंच मास्टर कृष्णराव यांच्या ‘किचक वध’ चित्रपटातलं अत्यंत गाजलेलं, भूप रागात बांधलेलं ‘धुंद मधुमती रात रे’ नितांत मधुर प्रणय गीताचं ही संगीत डीडींनी केल्याची आणि त्याच्या तालमीसाठी, त्यांच्या गिरगावातल्या घरी लतादीदी आल्याची आठवण त्यांची कन्या आणि गायिका डॉक्टर अपर्णा मयेकर यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितली होती. डीडींनी सुमारे ६० चित्रपट तसंच डझनभर नाटकांना संगीत दिलं. मात्र ‘पाहू रे किती वाट’ चित्रपटाची गाणी ही डावजेकरांना विशेष प्रिय होती. याच चित्रपटासाठी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी’ हे स्फूर्तिगीत तत्कालीन सर्व विक्रम मोडीत अमाप लोकप्रिय झालं होतं. सैनिक हो तुमच्यासाठी… मूळ लिहिलेलं गीत हे काहीसं क्लिष्ट वाटल्यामुळे दिग्दर्शक राजा ठाकूर यांच्या पसंतीस उतरलं नव्हतं, पण गदिमांना हे सांगणार कोण? हे आव्हान डीडींनी स्वीकारलं. त्यांनी माडगूळकरांना परत प्रसंग सांगितला. प्रथम माडगूळकर जरी रागावले तरी अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत सहा अंतरे असलेलं गीत लिहून दिलं. या गीताचे शब्द, सूर, रचना, प्रसंग हे सगळं इतकं प्रभावी झालं की, आशा भोसले यांना ध्वनिमुद्रणाच्या वेळी अश्रूपात अनावर झाला होता आणि आजही प्रत्येक संवेदनशील श्रोत्याला तोच अनुभव येतो. सर्वोत्तम संगीताचा पुरस्कार मिळालेल्या ‘पाठलाग’ चित्रपटाचं शीर्षक गीत त्यांच्या प्रतिभेची, प्रयोगशीलतेची, सर्जनशीलतेची साक्ष देतं. गूढ कथावस्तू असलेल्या चित्रपटासाठी शीर्षक गीत साजेसं हवं. बजेट मात्र तूटपुंज.
तेव्हा हा अडसर न मानता त्यांनी केवळ एक गिटार, एक इलेक्ट्रिक ऑर्गन आणि ट्रम्पेट ही तीन वाद्य, गदिमांचे चपखल शब्द आणि आशा भोसले यांच्या सुरेल गळ्याचा साथीनं त्यांनी ‘या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती’ हे चंद्रकंस रागावर आधारित अस्वस्थ करणारं नितांत गूढरम्य गीत रचलं. ओतप्रोत भावना, तरल प्रणय, तळमळ, एकाकीपणाच्या छटा या रागातून प्रभावीपणे व्यक्त होतात. ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६२), ‘पाठलाग’ (१९६४), ‘संथ वाहते कृष्णामाई’ (१९६७) आणि ‘धरतीची लेकरं’ (१९७०) या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार, तर ‘यशोदा’ (१९७४) या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा सूरसिंगार पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य सरकारनं १९९५ साली त्यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कारनं सन्मानित केलं.
डीडी केवळ संगीतकार नव्हते. त्यांचं कला जीवन हरहुन्नरीपणा तसंच अष्टपैलुत्वानी नटलेलं होतं. त्यांच्या कलाविश्वाचा परिघ गायन, वादन, नर्तन(टॅप डान्स), गीत लेखन, चित्र रेखाटन, संशोधन आदींनी संपन्न होता. मळलेल्या वाटेवरून वाट‘चाल’ न करता आपली प्रत्येक रचना नवं नवल श्रवणोत्सव घडवणारी असावी, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांचा हा ध्यासच त्यांना संगीत विश्वात ध्रुवपद देता झाला.
-नितीन सप्रे