मनोज तिवारी, कन्हैया कुमार, मनेका गांधी रिंगणात
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी ७ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात तीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे रिंगणात आहेत. तर तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे निवडणूक लढवत आहेत. याशिवाय मनोज तिवारी, मनेका गांधी, नवीन जिंदाल, बन्सुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ हेही रिंगणात आहेत.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार होत्या, मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता सहाव्या टप्प्यात येथे मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या टप्प्यात ८८९उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये ७९७ पुरुष आणि ९२महिला उमेदवार आहेत.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे १२४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभेच्या ५४३जागांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत ४२९ जागांवर मतदान झाले आहे. २५ मे पर्यंत एकूण ४८७जागांवर मतदान पूर्ण होईल. शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात ५६ जागांवर मतदान होणार आहे.