मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी चुकीचे फेरफार करून प्रभाग पाडल्याने मुंबईत काँग्रेस विरुद्ध सेना वाद पेटला आहे.
मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा काँग्रेसच्या माजी विरोधी पक्ष नेत्यांनी खळबळजनक आरोप केला आहे. माजी गटनेते रवी राजा यांनीही सेनेवर निशाणा साधला आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनाने मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेने स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा झालेत. माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, आसिफ झकेरिया, सुफियान वनु, कमरजहाँ सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणा-या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडले आहेत.
वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाल्याची काँग्रेसची भावना आहे.
यावर येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर घेऊन मुंबईतील काँग्रेस नेते चर्चा करणार असल्याचे समजते.
शिवसेनेकडून जाणिवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढु नये याकरता प्रयत्न होत आहेत. त्यावर तोडगा काढू, असे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.