नागपुर : लहान मुलांचे अपहरण (child trafficking) करुन त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहे.
एका आठ महिन्याच्या मुलाच्या अपहरणानंतर नागपूर पोलिसांच्या तपासात आतापर्यंत सात मुलांच्या अपहरण आणि विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तीन प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणात प्रजापती दाम्पत्याला राजस्थानमधील कोटामधून पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. दाम्पत्याने पोलिसांना सांगितले की त्यांनी आणखी तीन मुलांची दीड ते अडीच लाख रुपयांमध्ये विक्री केली आहे. तसेच अटकेच्या वेळी त्यांच्याजवळ असलेले आणखी दोन मुलेही ते विकण्याच्या तयारीत होते. मात्र हे पाचही मुले आमची स्वतःची अपत्य असून गेल्या पाच वर्षात प्रत्येकी दहा महिन्याच्या अंतरात मार्च १८, फेब्रुवारी १९, मार्च २०, फेब्रुवारी २१, फेब्रुवारी २२ मध्ये ही पाच ही मुले एक एक करून आमच्याकडे जन्माला आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
त्यांच्या याच दाव्याची तपासणीसाठी आता पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जितेशच्या विक्रीमध्ये ज्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी ही आणखी दोन मुलाची अशाच पद्धतीने विक्री केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर विक्री करण्यात आलेली ही सर्व पाचही बालक वेगवेगळ्या शहरातून नागपुरात आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.