वावरातून आले थेट
मी घरची ना दारची
मी लवंगी मिरची
आहे कोल्हापूरची
घरच्या घरी वाळवून
कुटून ठेवतात मला
तिखट हवं तेव्हा
मग येते मी कामाला
खात्री देत नाही मी
विकतच्या मसाल्याची
पोट बिघडलं तुमचं की
बोलणी आम्ही खायची
भाजीत माझा नेहमी
उपयोग होतो खास
माझा बनवलेला ठेचा
झणझणीत झकास
आधी असते हिरवी
नंतर होते लाल
जपून खा मला
नाही तर होतील हाल
जहाल म्हणूनच मला
ओळखतो सारा गाव
मिठासोबत माझेच
अहो, घेतात सारे नाव
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) कच्च्याची लागते
आंबट फोड
पिकल्यावर होतो
मधुर गोड
रस याचा पिऊन
एकदा तरी पाहा
फळांचा राजा
कोण बरं हा?
२) पाय याचे बारीक
डोक्यावर तुरा
पावसाला झेलून
तो फुलवी पिसारा
नाच त्याचा पाहून
रान सारे डोले
म्याओ म्याओ करून
कोण बरं बोले?
३) गरगर फिरून
दमत कसे नाही
स्वतःसोबत इतरांना
पळवत राही
तीन चमचे बारा वाट्या
त्याच्याकडे असे
वेळेचा हिशोब
कोण सांगताना दिसे?
उत्तर –
१)आंबा
२) मोर
३) घड्याळ