नाशिक : नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि सरकारच्या दोन वर्षांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यासाठी भाजपतर्फे मोर्चा काढण्यात आला. नाशिकचे संपर्क प्रमुख माजी मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर देखील नाराजी व्यक्त केली.
नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी दुपारी ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे आणि नुकताच ओबीसी आरक्षणाला मिळालेली स्थगितीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चाची हाक दिली होती. हा मोर्चा त्रिंबक नका शालिमार चौक येथून मेन रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
नाशिक जिल्ह्याचे संपर्क नेते जयकुमार रावल तसेच आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे ,राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, पवन भगुरकर, प्रशांत जाधव, नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती गणेश गीते, अरुण पवार कमलेश बोडके, देवदत्त जोशी, चंद्रशेखर पंचाक्षरी, यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामध्ये राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.