किरीट सोमय्या यांनी केला होता आरोप; नेमकं प्रकरण काय?
रत्नागिरी : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आलेल्या असताना ठाकरे गटाच्या (Thackeray group) एका महत्त्वाच्या नेत्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) अनिल परब यांना रत्नागिरीतील (Ratnagiri) दापोली येथील त्यांचं साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब (Anil Parab) आणि सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सोमय्या आणि अनिल परब या दोघांमध्ये या मुद्द्यावरुन वाद प्रतिवाद झाले होते. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने चार आठवड्यात रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मागे खेड जिल्हा कोर्टाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र आणि राजकीय नेते सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक अनियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते.
राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्त्र समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली होती. यामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, याबाबत त्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.