भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीत देखील एकाचा अतिउत्साहाच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. लोणावळ्यातील (Lonavala) धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या प्रश्न अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच सायंकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मनाई केली आहे. नियमावलीकडे दुर्लक्ष करणारे पर्यटक आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहे.
लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण-तरूणी येतात. रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहे. तसे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आले आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अपघात, पाण्यामध्ये तरुणाचा अतिउत्साह, सेल्फी, फोटोग्राफी, व्हीडीओ आणि सोशल मीडिया लाईव रिलीजच्या नादात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे.
लोणावळा, मुळशी, मावळ तसेच पवना परिसरातील नदी, धबधबे या ठिकाणी पाण्यात उतरून तरुणांनी अतिउत्साहीपणा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. येथील निसर्गाचा आनंद घेताना इतरांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.