रत्नागिरी : केंदीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. राणे यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून गावागावात जाऊन तेथील प्रतिष्ठित व्यक्तींच्या ते भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठींचा फायदा आता राणेंना होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रशासनाकडून या ना त्या कारणावरून त्रास देणे सुरू केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
त्यातच उबाठा शिवसेना गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांना पोलीस प्रशासनाकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार राजन साळवी यांच्यावरील एसीबीच्या कारवाईवरून मोरे यांनी बाळासाहेब असते तर एसीबीच्या अधिकाऱ्यांचे काय केले असते, असे वक्तव्य केले होते. यावरून त्यांच्यावर विविध कलमांखाली खेड पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या नोटीसवर खेड प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार असून मोरे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मोरे यांना तडीपार करण्यात आल्यामुळे ते रत्नागिरीत ठाकरे गटाचा प्रचार करू शकणार नाहीत, परिणामी त्याचा फटका उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांना बसण्याची शक्यता आहे. प्रचार ऐन रंगात आला असताना ही कारवाई झाल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.