‘पाणी जपून वापरा’ असे आवाहन
मुंबई : सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता मुंबईकरांनाही पाणीबाणीच्या संकटाला समोर जावे लागणार आहे. मे महिन्यात मुंबईमधील कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं व बुधवारीच जास्तीचा पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतलं आहे. हे काम पुढील आठवड्यात गुरुवार, २मे ते शुक्रवार, ३मे रात्री १० या वेळेत करण्यात येणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणी बंद असलेल्या जलवाहिनीचे २४ तासांत अलगीकरण करण्यात येणार आहे. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा असेल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पालिकेने सांगितले.
या भागात पाणीपुरवठा बंद-
- गांधी नगर, संजय नगर, लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, , सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव, बंदर पखाडी, भाबरेकर नगर या परिसरात शुक्रवारी ३ मे रोजी पाणी येणार नाही.
- जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत या परिसरात देखील ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
- चारकोप म्हाडा सेक्टर – ०१ ते ०९ मध्ये ३ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णता बंद असणार आहे.
- आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम), महावीर नगर, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, म्हाडा एकता नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण येथे गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.