आमदार नितेश राणे यांची सणसणीत टीका
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मविआमध्ये (MVA) जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसला (Congress) विचारात न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. त्यातच ठाकरे गटाने (Thackeray Group) जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नव्या यादीमध्ये मुंबईतील सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे समोर आले. त्यामुळे काँग्रेसला वगळण्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा डाव आहे, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
नितेश राणे म्हणाले, शरद पवारांसोबत (Sharad Pawar) काल मातोश्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसला सोबत न घेता निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला, ही आम्हाला मिळालेली माहिती आज तंतोतंत खरी ठरली. आज आलेल्या उबाठाच्या यादीने यावर शिक्कामोर्तबच केलं.
उबाठा आणि शरद पवारांना काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचाय. अशी टीका नितेश राणे यांनी केली. ते म्हणाले, मुंबईतल्या सहापैकी चार जागा जर उबाठाच लढवणार असेल, तर काँग्रेसच्या हाती काय लागणार? बाबाजी का ठुल्लु? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
बंटी आणि बबली तुमचे कसे होणार?
काँग्रेस नेते आणि पक्षश्रेष्ठींना हे कळलं पाहिजे की जो उद्धव ठाकरे स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही, जो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो संजय राजाराम राऊत स्वतःच्या घरच्यांचा झाला नाही, तर हे बंटी आणि बबली तुमचे कसे होणार? याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजच विचार करावा, असं नितेश राणे म्हणाले.