Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीMann ki Baat : 'मन की बात' कार्यक्रमाचा १०४ वा भाग प्रसारित

Mann ki Baat : ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०४ वा भाग प्रसारित

चांद्रयान मोहीम, जी २०, जागतिक विद्यापीठ स्पर्धा… आणखी काय काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाचा भाग प्रसारित करण्यात येतो. यातून ते देशवासियांना संबोधित करत असतात. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेमुळे (India Moon Mission) तसेच या महिन्यात भारताने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आजचा ‘मन की बात’चा कार्यक्रम अत्यंत खास असणार होता. आज हा १०४ वा भाग प्रसारित करण्यात आला. यावेळेस पंतप्रधानांनी चांद्रयान मोहिमेचे कौतुक करतानाच जागतिक विद्यापीठ स्पर्घेतील खेळाडूंशीही संवाद साधत त्यांचे कौतुक केले.

पंतप्रधान म्हणाले की, “चांद्रयानाचे यश हे खूप मोठे आहे. प्रत्येक ठिकाणी चांद्रयानाची चर्चा होत आहे. यशाचा सूर्य हा चंद्रावर देखील उगवतो असं चांद्रयानाच्या यशानंतर म्हटलं जात आहे. चांद्रयान भारताचे असे स्पिरीट बनले आहे, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त जिंकण्याचे ध्येय साध्य करु शकते.” चांद्रयान मोहिमेतील नारीशक्तीच्या योगदानाबद्दल ते म्हणाले की, “भारतातील महिला या आता अंतराळाला देखील आव्हान देत आहेत. भारताच्या मुलींची महत्त्वाकांक्षा इतकी वाढली आहे की, देशाचा विकास करण्यापासून त्यांना आता कोणीही थांबवू शकत नाही.”

जी-२० मध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सहभाग

जी २० चे यंदाचे यजमान पद भारता कडे आहे. याविषयीही त्यांनी आजच्या कार्यक्रमात उल्लेख केला आहे. ते म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी भारत तयार आहे. तसेच जी-२० परिषदेच्या इतिहासातील भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० चे व्यासपीठ हे सर्वसमावेशक बनले आहे. भारताच्या निमंत्रणावरुनच आफ्रिकन देश हे जी-२० परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता आफ्रिकन देशाचा आवाज हा जगातील महत्त्वाच्या व्यासपीठावरुन प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे.”

जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदी यांनी विश्व संस्कृत दिनाच्या संस्कृतमधून शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृतीतील संस्कृतचे महत्त्व पंतप्रधान मोदींनी सांगितले. संस्कृत ही प्राचीन भाषा असून योग, शास्रांसारख्या गोष्टी संस्कृत भाषेत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

जागतिक विद्यापीठ स्पर्धांमधील खेळाडूंचे कौतुक

चीनमध्ये काहीच दिवसांपूर्वी जागतिक विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. यावेळी भारताच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत एकूण २६ पदकं या स्पर्धांमध्ये जिंकली आहेत. यामधील ११ सुवर्ण पदकं आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद देखील साधला आहे. पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की, १९५९ पासून सरु झालेल्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये भारताने जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या ही आतापर्यंत १८ होती. पण यंदाच्या एका वर्षात एकूण २६ पदके भारताला मिळाली आहेत. तसेच आपल्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन दिले गेले आहे, याबद्दल त्यांनी कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -