Thursday, June 18, 2026

ST Bus : बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर लगाम

ST Bus : बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर लगाम

१५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३.८३ कोटी रुपयांची वाढ

मुंबई, दि. १८ : राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नावर दिसून आला आहे. अवघ्या १५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ झाली असून दररोजच्या सरासरी उत्पन्नात सुमारे ३ कोटी रुपयांची भर पडली आहे. (ST Bus)

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन आणि एसटी यंत्रणेने संयुक्त कारवाई केली. (Pratap sarnaik)

एसटी महसूल ९.७१ टक्क्यांनी वाढला

एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५ कोटी ३४ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले. मागील वर्षीच्या याच कालावधीत हे उत्पन्न ४ कोटी ५१ लाख रुपये होते. यामुळे ४३ कोटी ८३ लाख रुपयांची म्हणजेच ९.७१ टक्के वाढ झाली आहे.

उत्पन्नवाढीमध्ये रायगड, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नांदेड या विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे विभागाने सर्वाधिक 5 कोटी 97 लाख रुपयांची वाढ नोंदवली असून त्यापाठोपाठ सातारा (3 कोटी 46 लाख), छत्रपती संभाजीनगर (२ कोटी ६६ लाख), नांदेड (२ कोटी २७ लाख), रायगड (२ कोटी १७ लाख) आणि अमरावती (१ कोटी ६० लाख) विभागांचा समावेश आहे.

एसटी प्रवाशांची संख्या वाढली

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या महसुलावर मोठा परिणाम होत होता. कठोर कारवाईमुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला असून त्याचे प्रतिबिंब उत्पन्नवाढीत स्पष्टपणे दिसून येत आहे.

राज्यातील सर्व बसस्थानक परिसर अवैध प्रवासी वाहतुकीपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा