Tuesday, August 18, 2026

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली आहे. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी येथील रहिवासी असलेल्या सुवरे कुटुंबाची अवघ्या चार वर्षांत काळाने पूर्णपणे ताटातूट केली. चार वर्षांपूर्वी कुटुंबातील कर्ते पुरुष चंद्रकांत सुवरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर पत्नी छाया चंद्रकांत सुवरे यांनी अत्यंत जिद्दीने आणि बेताच्या परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. एका गारमेंट शॉपमध्ये काम करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले. मात्र, नशिबाचा फेरा इतका वाईट ठरला की छाया सुवरे यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आणि दोन्ही मुलींवरील आई-वडिलांचे छत्र पूर्णपणे हरपले.

रुढी-परंपरा बाजूला सारत लेकीचा धाडसी निर्णय

आईच्या अचानक जाण्याने सुवरे भगिनींवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, अशा भीषण दुःखाच्या प्रसंगीही खंबीर राहत मुलींनी एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. मुलगा आणि मुलगी असा भेद न करता, आपल्या लाडक्या आईला अंतिम निरोप देण्यासाठी तिची मुलगी शामली चंद्रकांत सुवरे हिने पुढे येत स्वतः मुखाग्नी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. पारंपरिक रुढी-परंपरांच्या पलीकडे जात मुलीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलगी ही केवळ परक्याचे धन नसून ती आई-वडिलांची सर्व कर्तव्ये समर्थपणे पार पाडू शकते, हेच या कृतीतून सिद्ध झाले.

ग्रामस्थ आणि नातेवाईकांची खंबीर साथ

मुलींनी घेतलेल्या या पुरोगामी निर्णयाचा उक्षी (बनाची वाडी) आणि सासर असलेल्या कोंडये (रत्नागिरी) येथील ग्रामस्थांनी पूर्ण आदराने स्वीकार केला. कोणत्याही जुनाट विचारांना थारा न देता नातेवाईक आणि गावकरी या कठीण काळात मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. भांडुप येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात छाया सुवरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शामलीने जेव्हा अश्रूंसहित आईच्या चितेला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.

समाजातील बदलत्या विचारसरणीचे आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक

सुवरे भगिनींनी दाखवलेले हे धैर्य केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित न राहता बदलत्या समाजाची आणि पुरोगामी विचारांची प्रचिती देणारे ठरले आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या या मुलींनी दुःखाच्या काळात दाखवलेली परिपक्वता ही कौतुकास्पद आहे. उक्षी आणि कोंडये गावातील ग्रामस्थांनीही या प्रसंगी पुरोगामी भूमिका घेत मुलींच्या धाडसाला पाठिंबा दिला, ज्यामुळे समाजासमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ उभा राहिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >