मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच आपण बाप्पा आणि मोदकाचे हे अतुट नाते पाहत आलो आहोत. पण, मोदक खाताना तुम्ही कधी विचार केलाय का की या स्वादिष्ट प्रसादाचा इतिहास नेमका काय आहे? प्राचीन काळातील मोदक आणि आज आपण आवडीने खातो तो 'उकडीचा मोदक' यात काय फरक होता? तसेच दक्षिण भारतातील 'कोळकटै', 'कडबू' किंवा पूर्व भारतातील 'पीठा' या पदार्थांचा मोदकाशी काही संबंध आहे का? चला तर मग, मोदकाचा हाच रंजक आणि पौराणिक प्रवास सविस्तर जाणून घेऊया.
पुराणकथांमधील मोदकाचे स्थान आणि २१ मोदकांची परंपरा
भारतीय पुराणांमध्ये मोदकाचे अनेक संदर्भ आढळतात. याविषयी दोन अत्यंत लोकप्रिय कथा प्रचलित आहेत: पहिली कथा (शिव-पार्वती आणि प्रदक्षिणा): एकदा कार्तिकेय आणि गणपती यांच्यात एक 'दिव्य मोदक' मिळवण्यासाठी स्पर्धा लागली. जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा आधी पूर्ण करेल, त्याला तो मोदक मिळणार होता. कार्तिकेय आपल्या मयुरावर बसून पृथ्वीप्रदक्षिणेसाठी निघाले, तर बुद्धीचे देवता असलेल्या बाल गणेशाने आपले आई-वडील (शिव-पार्वती) म्हणजेच संपूर्ण जग मानून त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली. बाप्पाच्या या चातुर्यावर खूश होऊन पार्वती देवीने तो दिव्य मोदक गणपतीला दिला. दुसरी कथा (माता अनसूया आणि २१ ढेकर): ऋषी अत्री यांची पत्नी माता अनसूया यांनी एकदा भगवान शिव, माता पार्वती आणि बाल गणेशाला भोजनाचे निमंत्रण दिले होते. बाप्पा भोजन करत होते, पण त्यांची भूक काही शांत होत नव्हती. शेवटी माता अनसूया यांनी एक गोड पदार्थ (मोदक) बाप्पाला खाण्यास दिला. तो खाताच गणपती बाप्पाचे पोट भरले आणि त्यांनी आनंदाने तब्बल २१ ढेकर दिले! बाप्पा तृप्त झालेले पाहून माता पार्वतीनेही २१ ढेकर दिले. असे मानले जाते की, या घटनेनंतरच बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा रूढ झाली.
नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. ...
प्राचीन साहित्य आणि आयुर्वेदातील मोदक
केवळ लोककथाच नाही तर प्राचीन भारतीय साहित्य, रामायण, महाभारत आणि 'सुश्रुतसंहिता' यांसारख्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही 'मोदक' या शब्दाचा उल्लेख आढळतो. तसेच मध्ययुगीन पाककलेची माहिती देणाऱ्या 'मानसोल्लास' या ग्रंथातही मोदक बनवण्याच्या विविध पद्धतींचे वर्णन आहे. तथापि, प्राचीन काळात उल्लेख असलेला मोदक हा आजच्यासारखाच तांदळाच्या पिठाचा आणि उकडीचा होता का, याबाबत निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत.
उकडीचा मोदक कधी आणि कसा रूढ झाला?
तांदळाची उकड काढून त्यात गूळ आणि नारळाचे सारण भरून ते वाफवणे, ही पद्धत महाराष्ट्रात नक्की कधी सुरू झाली याचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र, मोदकाचे स्वरूप हे प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक खाद्यसंस्कृतीनुसार बदलत गेले. मुबलक नारळ आणि तांदूळ उपलब्ध असणाऱ्या कोकण किनारपट्टीवर 'उकडीचे मोदक' लोकप्रिय झाले, तर विदर्भ आणि इतर भागात 'तळणीचे मोदक' बनवण्याची परंपरा तयार झाली. दक्षिण भारतात याला 'कोळकटै', 'कडबू' किंवा 'कुडुमु' म्हटले जाते, तर पूर्व भारतात याच्याशी साम्य असणारा 'पीठा' हा पदार्थ बनवला जातो. आजच्या आधुनिक युगात चॉकलेट, खवा, ड्रायफूट्स अशा विविध फ्लेव्हर्सचे मोदक बाजारात मिळत असले, तरीही सुवासिक केळीच्या पानावर साय-दूध किंवा साजूक तुपाची धार सोडून खाल्ल्या जाणाऱ्या पारंपारिक 'उकडीच्या मोदका'ची जागा कशालाच घेता येत नाही.






