Tuesday, May 26, 2026

Children's drama : बालनाट्यांचे दिवस!

Children's drama : बालनाट्यांचे दिवस!

उन्हाळा आला, की आंबे, फणस, करवंदे, जांभळे, जाम या फळांची हटकून आठवण होते. फणसेची साटे, आंबापोळी, फणसपोळी, वाळवणं, मुरांबा, पाकातले आवळे, नानाविध लोणची अशा अनेक गोष्टी आठवायला लागतात. आईच्या हातची लोणची, आजीच्या हातची आंब्याची सांजापोळी अशा गप्पा मैत्रिणींमध्ये रंगू लागतात. कैरीच्या पन्ह्याची आणि चटकदार भेळीची चर्चा सुरु होते. पापड, मिरगुंड, साबुदाण्याच्या फेण्या, सांडगे यांचे किस्से रंगतात.

गेल्या आठवड्यात माझ्या एका प्रेमळ मैत्रिणीने फणसाची सांदणं आठवणीने करून दिली. मी तर हा गोड चवीचा पदार्थ पहिल्यांदाच चाखला.

एकीकडे तीव्र उन्हाच्या झळा, तर दुसरीकडे लालभडक आगीच्या ज्वाळाच जणू असा पांगारा! प्रत्येक ऋतूची विशिष्ट झाडे असतात. त्यांचे अनुपम सौंदर्य खास त्यांचेच असते.

उन्हाळ्याचे असे विविध संदर्भ आठवताना मला खास लक्षात आहे, तो बालनाट्यांचा संदर्भ!

माझ्या मुलीच्या निमित्ताने हा नाट्यप्रकार मला जवळून अनुभवता आला. आमच्या सोसायटीच्या खुल्या नाट्यगृहात एकदा लेकीने राजू तुलालवार यांच्या चिल्ड्रन्स थिएटरचे एक बालनाट्य पाहिले आणि ते तिला इतके आवडले की आम्ही दोघी सुट्टीत बालनाट्यांचे प्रयोग पहायला जायला लागलो. प्रेक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडून ती हळूहळू बालनाट्य कार्यशाळेत दाखल झाली आणि चांगलीच रमली. गोष्ट रचणे, संवाद लिहिणे, धीटपणे ते म्हणणे, सोबत अभिनय करणे असा तिचा प्रवास सुरू झाला. मग आईला दिमतीला राहणे आले. मुंबईभरात जिथे-जिथे म्हणून प्रयोग लागले तिथे तिथे माझी हजेरी लेकीसोबत लागायचीच. सुरुवातीला पुलपाखरासारखे डौलाने उडायचे आणि राक्षसाने पकडले की घाबरून पळायचे, इतकाच अभिनय करायला लागायचा. पण फुलपाखराची वेशभूषा, लोभस पंखच इतके आवडलेले असायचे की ती त्यातच खूश असायची.

‘भीतीबाई बाय बाय’ नावाच्या एका छोट्यांच्या नाटकात तिने काम केले होते आणि नंतर मला जाणवले की रंगमंच, प्रेक्षक यांची भीती तिला अजिबात वाटेनाशी झाली. सभाधीटपणा वाढला. उच्चार सुधारू लागले. एकत्र मिळून प्रयोग करायची मजा ती छान लुटू लागली. स्वतःच विषय ठरवून कल्पनेने नाटुकले रचायला लागली. मुलांना टीव्हीसमोर दिवसभर बसवून न ठेवता, त्यांची कल्पनाशक्ती फुलवण्याचा बालनाट्य हा हमखास मार्ग आहे.

मराठी साहित्य जगतात पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी अशा दिग्गज लेखकांना बालनाट्य लिहायचा मोह टाळता आला नाही. राजा राणीला घाम हवा, दुर्गा झाली गौरी, चांभार चौकशीचे नाटक, राजा सिंह, अलबत्या गलबत्या अशा नाटकांनी मराठीत बाल नाट्यांची परंपरा घडवली. रत्नाकर मतकरी आणि प्रतिभा मतकरी यांनी वंचित समाजातील मुलांना सोबत घेऊन वंचितांचा रंगमंच निर्माण केला. आविष्कारच्या चंद्रशालेने रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला गुणी कलावंत दिले

बालनाट्य हे एकतर अतिशय सजीव माध्यम आहे आणि भाषेच्या जडण-घडणीचा तर हा उत्तम उपाय आहे.

आजही मला बालनाट्य पहायला मनापासून आवडते कारण रंगंचावरचा प्रयोग पाहणे तर आनंददायी असतेच पण बाल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अनुभवणे हे देखील आनंददायी असते. नुकताच माझ्या एका विद्यार्थ्याचा फोन आला आणि तो म्हणाला, की तो बालनाट्य उत्सव आयोजित करतोय आणि त्याकरता त्याने स्वतः दोन नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मुख्य म्हणजे सुयश म्हात्रे या माझ्या विद्यार्थ्याने मराठीतील बालनाट्यांवर पीएच.डी. करायचे ठरवले आहे. त्याच्या या विषयाचे महत्त्व निश्चितच मोठे आहे. मनापासून वाटते की उन्हाळा जसा आंबे, फणस, काजू, जांभळं - करवंदांचा तसाच तो कल्पक बालनाट्यांचा!

Comments
Add Comment