Tuesday, May 26, 2026

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर! तब्बल ५०० वटवाघुळांचा मृत्यू, ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

Vidarbha Heat Wave : विदर्भात उष्णतेचा कहर! तब्बल ५०० वटवाघुळांचा मृत्यू, ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

विदर्भात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस नवे विक्रम मोडताना दिसत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असतानाच आता वन्यजीवांनाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा परिसरात तब्बल ५०० वटवाघुळांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळेच या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. (Vidarbha Heat Wave)

वनविभागाने काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे जंगलातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. (Vidarbha Heat Wave)

विदर्भात रेड अलर्ट, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा :

हवामान खात्याने मंगळवारी Amravati, Wardha, चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Vidarbha Heat Wave)

दरम्यान, Brahmapuri येथे तब्बल ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. त्याखालोखाल नागपूर ४६.५ गडचिरोली ४६.४, गोंदिया ४६.१ चंद्रपूर आणि वर्धा ४६ अंश सेल्सिअस तापमानाने अक्षरशः भाजून निघाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. (Vidarbha Heat Wave)

वाढत्या तापमानामुळे वाघ झाला हिंसक?

काही दिवसांपूर्वी Chandrapur जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने तपास सुरू केला असून वाढत्या तापमानामुळे वाघ हिंसक झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रचंड उष्णतेमुळे वाघांमध्ये मानसिक ताण आणि चिडचिड वाढू शकते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी वाघ पाण्याजवळ राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र योग्य वेळी पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांचा आक्रमकपणा वाढण्याची शक्यता असते. अशाच परिस्थितीत तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला असावा, असे मानले जात आहे.

विशेष म्हणजे या वाघाने एकाचवेळी तब्बल १३ महिलांवर हल्ला केला होता. वनविभागाने या वाघाला जेरबंद केले असून त्याच्या हिंसक वर्तनामागील कारणांचा सखोल अभ्यास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >