Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीPankaja Munde : ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं!

Pankaja Munde : ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं!

गाडीवर हल्ला करणारे लोक मनोज जरांगेंच्या आंदोलनातील? पंकजा मुंडे थेट म्हणाल्या…

बीड : भाजपाकडून (BJP) बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Loksabha constituency) उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीडमध्ये प्रचार करत असताना काही मराठा आंदोलकांनी (Maratha protesters) त्यांची गाडी अडवली. तसेच त्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले, यासह ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला केला. यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रचारावेळी झालेल्या या गोंधळाबाबत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. गोंधळ घालणारे आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाशी संबंधित नसावेत, ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणारे लोक फार नव्हते. चार-पाच जणच तिथे होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नव्हते. त्यांनी खिशातून रुमाल काढून दाखवले. आसपासच्या गावात इतर नेत्यांनाही अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. हे तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवतायत. केवळ मलाच नाही तर इतर नेत्यांनाही काळे झेंडे दाखवत आहेत. मी पोलिसांना सांगितलं आहे की, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. परंतु, काहींनी तिथे गोंधळ घातला, आरडाओरड सुरू केली. मला असं वाटतं की, ते रुमाल दाखवणारे चार-पाच लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील असावेत. परंतु, बाकीचे जे गोंधळ घालणारे लोक होते ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील नसावेत. मला वाटतं ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं.

मराठा आंदोलक तुम्हाला विरोध का करत आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ते केवळ मलाच थोडी विरोध करतायत? इतरांनाही त्यांचा विरोध चालू आहे. तिथे इतर नेत्यांना मराठा आंदोलकांनी जाऊ दिलं का ते तपासा. ते समाजातील सर्वच नेत्यांचा विरोध करत आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांनाही अशा विरोधाचा सामना करावा लागत आहे. मलाच विरोध होतोय अशातला काही भाग नाही. केवळ मलाच विरोध होत असेल तर ते विरोधकांकडून जाणीवपूर्वक चालू असेल.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला केवळ इतकंच वाटतं, की हे आंदोलन करत असताना कोणाचाही अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. परंतु, मला खात्री आहे की, ती माणसं जरांगे पाटलांची नाहीत, असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -