Thursday, May 9, 2024
Homeदेशमोदी है तो मुमकीन है : 'मथुरा-काशीच नव्हे तर देशातील ४० धार्मिक...

मोदी है तो मुमकीन है : ‘मथुरा-काशीच नव्हे तर देशातील ४० धार्मिक स्थळे मुक्त करण्याची तयारी’

विश्व वैदिक सनातन संघाचा दावा

नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसातच उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याच उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील कृष्णजन्मभूमीचा वाद न्यायालयात सुरू आहे. वाराणसीच्या काशी-ज्ञानवापी प्रकरणातही कोर्टात सुनावणी सुरू आहे. यासह मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचा मुद्दाही न्यायालयात आहे. अशात आता हिंदू संघटनांनी अशी ४० प्रकरणे न्यायालयात नेण्याची तयारी केली आहे. येत्या २०२४ मध्ये वसंत पंचमीच्या मुहूर्तावर याची सुरुवात केली जाईल, असा दावा विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह विसेन यांनी केला आहे. जितेंद्र सिंह यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. तर आता अन्य ४० धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी एकाचवेळी न्यायालयीन/संवैधानिक धार्मिक युद्धाची तयारी पूर्ण झाली आहे.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद खूप जुना आहे. हा वाद १३.३७ एकर जमिनीवरील मालकी हक्काशी संबंधित आहे. १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला होता. या करारात १३.७ एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. श्री कृष्ण जन्मस्थानकडे १०.९ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे आणि शाही इदगाह मशिदीकडे २.५ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे.

शाही इदगाह मशीद बेकायदेशीर अतिक्रमणातून बांधण्यात आल्याचे हिंदू पक्षाचे म्हणणे आहे. या जमिनीवर त्यांचा दावा आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीनही श्रीकृष्णाच्या जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंच्या बाजूने होत आहे. या प्रकरणी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि दिल्ली निवासी उपाध्यक्ष सुरजित सिंह यादव यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. यामध्ये १३.३७ एकर जागेवर बांधलेले भगवान कृष्णाचे मंदिर पाडून मुघल सम्राट औरंगजेबने ईदगाह बांधल्याचे म्हटले होते.

श्रीरामांचा वनवास संपला, श्रीकृष्णाची सुटका कधी होणार?

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद यांच्यात जसा वाद होता, तसाच ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरातही वाद आहे. स्कंद पुराणात नमूद केलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ हे सर्वात महत्वाचे हिंदू धार्मिक स्थळ मानले जाते. १९९१ मध्ये, काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांचे वंशज पंडित सोमनाथ व्यास, संस्कृतचे प्राध्यापक डॉ. रामरंग शर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली.

याचिकेत दावा करण्यात आला होता की, काशी विश्वनाथचे मूळ मंदिर २०५० वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधले होते. १६६९ मध्ये औरंगजेबाने ते पाडून त्या जागी ज्ञानवापी मशीद बांधली. ही मशीद बांधण्यासाठी मंदिराचे अवशेष वापरले गेले. येथील ज्ञानवापी मशीद हटवून संपूर्ण जमीन हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी हिंदू बाजूची मागणी आहे.

हिंदू भोजशाळेला वाग्देवीचे म्हणजेच सरस्वतीचे मंदिर मानतात, तर मुस्लिम या परिसराला कमल मौला मशीद म्हणतात. यावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. राजा भोजच्या नावावरून भोजशाळेचे नाव पडले आहे. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारे संरक्षित एक स्मारक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -