LATEST ARTICLES

चक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण…

नाशिक : वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर १९ वर्षीय पत्नी किरकोळ कारणावरून नवऱ्याशी न पटल्याने माहेरी गेली.‌ आईमुळेच बायको नांदायला येत नसल्याचा पतीचा समज झाला. त्याच रागातून त्याने आई सोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या पत्नीचे तीन मित्रांसह एका कारमधून अपहरण केल्याची घटना तालुक्यातील पांगरी येथे दोन दिवसांपूर्वी घडली. दरम्यान, अपहृत नवरी सह तिच्या पतीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. भविष्याचा विचार करून दोन्ही बाजूकडून या प्रकरणी समेट घडवत पडदा टाकण्यात आला.

दुसरीकडे पोलिसांची मात्र या प्रकरणी चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे या अनोख्या अपहरणाची चर्चा परिसरात रंगली आहे. पांगरी येथील एका १९ वर्षीय तरुणीने आई-वडिलांच्या इच्छे विरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव अण्णासाहेब पवार (२३) या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्या सोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यातून ती माहेरी आली. ती पुन्हा सासरी येत नसल्याचे बघून नवऱ्याने तीन मित्रांना सोबत घेत पांगरी बस स्थानक परिसरात ही मुलगी आई आणि भावासोबत पायी जात असताना आईला ढकलून देत मुलीला कारमध्ये घालून तीचे अपहरण केले. दरम्यान, अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. वावी पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडूनही तपास चक्र वेगाने फिरली.

अशातच तरुणाने या मुलीला प्रारंभी संगमनेर येथे कारने नेत तेथे तिला उतरून घेत तीन मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले. त्यानंतर या पती-पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला. तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात वावी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रागा वैतागत नवऱ्याविरोधात अपहरणाची फिर्याद दिलेली मुलगीच गजाआड असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन आल्याने पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. अपहरणात त्याला मदत करणाऱ्या तीन संशयीतांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

Save Trees : झाडांशी सलोखा जपू या…

मुंबई (मानसी खांबे) : २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संस्था स्थापन झाली होती. दरवर्षी जागतिक हवामान दिनाची थीम वेगवेगळी ठरविण्यात येते. त्यानुसार यंदाची थीम “Closing the early warning gap together” ही आहे. गेल्या काही वर्षांत, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, दुष्काळ, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटा यासारख्या नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल तीव्र होत चालला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यंदा हवामान बदल आणि अत्यंत हवामान घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी लवकर इशारा प्रणालींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे.
अलिकडच्या काही वर्षांत मुंबईतील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सूर्य देव आग ओकत आहे. दुपारच्या सुमारास उष्णतेच्या लाटा अगांची अक्षरश: लाहीलाही करतात. उन्हाळा ऋतुही वाढत आहे. तुलनेत हिवाळा ऋतू अगदीच कमी होत चालला आहे. राज्यात अवकाळी धुमाकूळ घालत आहे. ग्लोबल वार्मिंगचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. तापमान वाढीमुळे शहरे होरपळत आहेत.

Aagra : आग्र्यातील शिवस्मारकाची पर्यटन विभागाकडे जबाबदारी

जगात शहरीकरणाची जणू स्पर्धाच रंगली आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या शहरांचा माग अविकसित, विकसनशील देशांतील शहरे घेत आहेत. जगात अशी चकचकीत शहरेच्या शहरे विकसित केली जात आहेत. शहरीकरणाच्या या पाठलागात वनीकरणावर कुऱ्हाड चालवली जात आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंचच्या उंच इमारती, काचेची घरे, महामार्ग, मेट्रो रेल्वे यांच्या उभारणीत झाडांची कत्तल केली जात आहे. जलद आणि सोयीस्कर महामार्ग बांधताना समुद्र, पृथ्वीच्या पोटात हात घातला जात आहे. औद्योगीकरणात झपाट्याने वाढ होत असताना प्रदूषणातही वाढ होत आहे. बांधकाम, इमारतीकरण, वाहतुकीची साधने यामुळे हवा प्रदूषणात भर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पाणी पातळीत वर्षागणीक वाढ होत आहे. जल प्रदूषण रोखण्यात अनेक देश अपयशी ठरत आहेत. त्याचे परिणाम हवामान बदलात दिसत आहेत. त्यामुळे आता तरी डोळे उघडा. वृक्षतोड थांबवा.

झाडे रुजून येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी किमान माती असणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरात माती शिल्लक आहे कुठे. मुंबई म्हणजे सिमेंट काँक्रीटचे जंगल झाले आहे. हा काँक्रीटचा विस्तार थांबवा. शक्य तितका भाग मातीचा राहुदे. मग त्यात पावसाचे पाणीही मुरेल. जपानच्या धर्तीवर मियवाकी ही कमीत कमी जागेतली घनदाट जंगले तयार करुया. प्रगती करताना पर्यावरणाशी सांगड घालूया. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करू या. झाडे हा पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. त्याला आपल्या आप्तेष्टांप्रमाणे जपू या. त्याचा परिणाम हमखास पर्यावरणावर होईल. अन्यथा अवकाळी, तापमानवाढ हे पर्यावरणाचे इशारे आहेत. ते वेळीच ऐकले नाहीत, तर पुढे अधिक घातक होईल.

Aagra : आग्र्यातील शिवस्मारकाची पर्यटन विभागाकडे जबाबदारी

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवजयंती दिनी केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यातही आग्र्यातील भव्य स्मारकाची तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे.

दंगलखोरांचा काश्मीर पॅटर्न

या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैद राहिलेले ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून अधिग्रहित करणार आहे. या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ, जाणकार तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अानुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी

देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबईसह उपनगरातील प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याबाबत ॲक्शन प्लॅन तयार करणार – रेल्वे मंत्री

नवी दिल्ली : मुंबई, ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. श्री. वैष्णव यांनी प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मकता दाखवत अॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याचे आश्वासन दिले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले.

महिलांसाठी विशेष लोकल सेवा, स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृहे, सर्व स्थानकांवर स्वच्छ आणि दर्जेदार महिला शौचालयांची व्यवस्था करावी, प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावे. रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत. ठाणे आणि मुलुंड च्या स्टेशनच्या दरम्यान एक नवीन स्टेशनच्या कामाला गती द्यावी. स्टेशनवरची वन रुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत ती लवकरात लवकर सुरू करावीत. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी अशा विविध मागण्या खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.

केंद्राकडून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत

मुंबई : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दि. १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या निर्णयाचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी मी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेबांसोबत थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.

राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मी त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानतो. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.

IPL 2025: ६७ धावा आणि ७ विकेट्स…कुणालच्या फिरकीनंतर साल्ट-कोहलीचे वादळ, RCBसमोर KKR उद्ध्वस्त

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२५चा पहिला सामना २२ मार्चला शनिवार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने सात विकेटनी विजय मिळवला. आरसीबीच्या विजयात कृणाल पांड्या, फिल साल्ट आणि विराट कोहली यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कृणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीने कहर केला. तर साल्ट आणि कोहलीने फलंदाजीमध्ये केकेआरच्या गोलंदाजांना धुतले.

नरेनच्या विकेटनंतर अडखळली केकेआर

ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एकवेळेस मोठ्या स्कोरच्या दिशेने जात होता. त्यांचा स्कोर ९.५ षटकांत एक विकेट बाद १०७ इतका होता. तेव्हा असे वाटत होते की केकेआर २००चा टप्पा गाठेल. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी चौकार-षटकारांचा पाऊस सुरू ठेवला होता. दरम्यान, त्यानंतर खेळ पूर्णपणे पालटला. कृणालच्या फिरकीसमोर केकेआरचे काही चालेना. त्यांचे विकेट पडण्यास सुरूवात झाली. यामुळे केकेआर बॅकफूटवर आली. केकेआरला आरसीबीसमोर १७५ धावांचे आव्हान दिले.

१७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. १७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. तेही रात्रीच्या वेळेस मैदानावर ओस पडत असताना. केकेआरला सुरूवातीला विकेट्सची आशा होती. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात धमाकेदार राहिली. विराट कोहली आणि फिल साल्टने मिळून केकआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी ५१ बॉलवर ९५ धावांची भागीदारी झाली.

अखेर अवकाशरागिणी परतली!

मधुरा कुलकर्णी

भारतीय वंशाची सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर १३ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार ही आनंदाची बातमी होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय स्थानकावरून त्यांचे पृथ्वीवर परतणे पुढे ढकलले गेले होते. नासा आणि ‌‘स्पेसेक्स‌’च्या फाल्कन प्रक्षेपकाद्वारे स्थानकाच्या दिशेने झेपावणाऱ्या अवकाश कुपीचे प्रक्षेपण काही तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकले नव्हते; ते १५ मार्च रोजी झाले. सुनीता विलियम्स आणि तिचे सहकारी यांना परत आणायला गेलेले अंतराळयान कक्षेत पोहोचले असल्याची माहिती ‌‘नासा‌’ने दिली होती. या मोहिमेद्वारे ॲनी मॅकलेन, निकोल आयरस, जपानचे तकुया ओनिश आणि रशियाचे किरिल पेशकोव्ह हे चौघे अंतराळवीर अंतराळात गेले. परतीच्या प्रवासामध्ये नासाचे निक हाग, सुनीता विलियम्स, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांनी अंतराळयानामध्ये प्रवेश केला आणि अंतराळ स्थानक आणि या यानामधला दरवाजा बंद झाला. त्यानंतर ‘अनडॉकिंग‌’ची प्रक्रिया सुरू झाली आणि हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून विलग झाले. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर फ्लोरिडाजवळच्या समुद्रामध्ये हे यान उतरले. त्यानंतर रिकव्हरी टीम्सद्वारे या कॅप्सुल्समधून दोघा अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले. सरतेशेवटी, भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरूप परतले. स्पेसेक्सच्या यानाने सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतल्या तेव्हा आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला. नासाचे स्पेस शटल, सोयुझ यान, बोईंग स्टारलायनर आणि स्पेसेक्स क्रू ड्रॅगन अशा चार वेगवेगळ्या स्पेस कॅप्सुल्समधून अंतराळ प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या अंतराळवीर ठरल्या.

सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन पृथ्वीवर परतले ही आनंदाची बातमी आहे. याशिवाय त्यांच्याबरोबर नासाच्या क्रू ९ मोहिमेअंतर्गत अवकाशात गेलेले दोन अंतराळवीरही परतले आहेत. विलियम्स यांच्या प्रतिमा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या तेव्हा त्यांचे वजन कमी झाल्याचे जाणवत होते. ही विस्तारित अंतराळ मोहिमेवरील अंतराळवीरांसाठी एक सामान्य समस्या असते. अंतराळात, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात राहताना शरीराची प्रकृती राखणे आव्हानात्मक असते. अशा वेळी शरीर पोषक तत्त्वांचे चयापचय कसे करते आणि ऊर्जेचा वापर कसा करते यावर बरेच काही अवलंबून असते. अशा अवस्थेत सुनीता विलियम्स यांचा अंतराळात वाढलेला मुक्काम ही चिंतेची बाब होती. तेव्हा विलियम्स यांचे गाल काहीसे खोलगट झाल्याचे दिसत होते. हे अनेकदा शरीराचे एकूण वजन कमी झाल्याचे लक्षण असते. यावरून विलियम्स यांना कॅलरीची कमतरता आहे, हे स्पष्ट जाणवत होते. अंतराळातील वास्तव्य वाढणे त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरले असते. अंतराळवीरांना उच्च-उंचीवर राहताना शारीरिक परिणामांचा सामना करावा लागतो. त्यात बदललेल्या वातावरणात हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनमार्ग यांच्या कार्याचा समावेश होतो. याव्यतिरिक्त अंतराळ प्रवासामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे होणारे आजार अंतराळवीरांना अधिक असुरक्षित बनवतात.
अंतराळात पृथ्वीच्या निम्न कक्षेत फिरत असलेल्या अवकाश स्थानकांमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची स्थिती असते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर स्थानकांमध्ये अक्षरशः तरंगत असतात. अशा परिस्थितीत जगणे अत्यंत जिकिरीचे असते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे मानवी शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात, हे सुनीता विलियम्स यांच्या ताज्या फोटोंमधून स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच जगभरातील, विशेषतः भारतातील खगोलप्रेमी चिंतेत पडले होते, ते आता चिंतामुक्त झाले आहेत. भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विलियम्स नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा अंतराळात मुक्काम केल्यानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळात त्यांचे इतक्या दिवसांचे वास्तव्य पुढील काळात विशेष दक्षता घ्यायला लावू शकते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने शरीर, डोळे, डीएनएमध्ये बदल होऊ शकतात. आधीच्या अध्ययनात अंतराळात वाढलेल्या अशा वास्तव्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसले होते. दीर्घकाळ अवकाशात राहिल्याने सुनीता यांना भावनिक-मानसिक पातळीवर तणाव जाणवू शकतो. अंतराळवीरांना त्या अानुषंगाने प्रशिक्षण दिले जाते. तरीही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अंतराळात गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने सुनीता यांचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाडांचीही स्थिती त्रासदायक राहू शकते.

दीर्घकाळ अंतराळात वास्तव्य करणाऱ्या सुनीता यांना उच्च पातळीवरील किरणोत्सर्गाला तोंड द्यावे लागू शकते. त्यातून भविष्यात त्यांना कर्करोग वा इतर व्याधी जडू शकतात. शरीरातील पेशी, डीएनएमध्येही परिवर्तन होऊ शकते. दीर्घकाळ बाहेरच्या जगाशी संबंध न राहिल्याने सुनीता यांना ‌‘स्पेसलाइट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम‌’ला तोंड द्यावे लागू शकते. त्यात डोळ्यांच्या नसांवर दबाव पडतो, दृष्टी कमकुवत होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, सुनीता यांना भविष्यातील संकटातून वाचण्यासाठी निगराणीखाली राहावे लागेल. ताकद राखण्यासाठी तसेच हाडांमधील बळकटी परत मिळवण्यासाठी कठोर प्रशिक्षणातून जावे लागेल. सुनीता यांच्या आधी अनेक अंतराळवीर अंतराळात दीर्घकाळ राहिले आहेत. रशियाचे वालेरी यांनी सर्वाधिक ४३७ दिवस राहण्याचा विक्रम नोंदवला होता. गेल्या वर्षी अमेरिकन अंतराळवीर फ्रँक ३७१ दिवसांच्या मुक्कामानंतर पृथ्वीवर परतले होते. त्यांच्या शरीरात अनेक व्याधी निर्माण झाल्याचे दिसले. दृष्टीसंबंधी समस्या, डीएनएमध्ये बदल, वजन कमी होणे, रोगप्रतिकारशक्तीत कमतरता असे बदल दिसून आले होते. त्यावरून अंतराळातील वास्तव्य वाढल्याचे काय दुष्परिणाम होतात याची कल्पना येऊ शकते.

१४ अंतराळवीरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात युनिव्हर्सिटी ऑफ ओटावाच्या संशोधकांना याबाबत माहिती मिळाली आहे. अभ्यासात समाविष्ट अंतराळवीरांमध्ये ब्रिटनच्या टिम पेक यांचाही समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सहा महिने घालवले आहेत, तसेच अंतराळात विविध विषयांवर संशोधनही केले आहे. या मोहिमेदरम्यान, अंतराळवीरांच्या रक्त आणि श्वासोच्छ्वासाचे नमुने घेण्यात आले. शरीरात कमी झालेल्या तांबड्या पेशींची संख्या मोजण्यासाठी असे करण्यात आले. या पेशी फुप्फुसांपासून संपूर्ण शरीरापर्यंत ऑक्सिजन पुरवतात. रोजच्या आयुष्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते. या संबंधातील अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि हॉस्पिटल फिजिशियन डॉ. गाय ट्रूडल म्हणतात, अंतराळात पोहोचल्यानंतर लाल रक्तपेशी नष्ट होत आहेत, हे आमच्या लक्षात आले. संपूर्ण मिशन दरम्यान ते सुरूच होते. मात्र, अंतराळात वजन जाणवत नसल्यामुळे तिथे असेपर्यंत ही फार मोठी समस्या भासत नाही. पृथ्वीवर परत आल्यानंतर सुनीता विलियम्स यांना अशक्तपणा आणि थकवा याची जाणीव होईल. शिवाय त्यांच्या स्नायूंची शक्तीही कमी होईल. अंतराळात दर सेकंदाला शरीरातून ३० लाख तांबड्या पेशी नष्ट होतात. जमिनीवर असताना केवळ दोन लाख पेशीच नष्ट होतात. मात्र, शरीर पुन्हा त्याची भरपाई करते. तसे न झाल्यास अंतराळ प्रवासी अंतराळात गंभीर आजारी पडतात. पण, शरीर सलग किती काळ या पेशींची कमतरता भरून काढण्यास सक्षम असते, याबाबत संशोधक ठाम नाहीत.

अभ्यासातून अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतरही ही समस्या दूर झाली नसल्याचे आढळले आहे. पृथ्वीवर परतल्याच्या एका वर्षानंतरही त्यांच्या शरीरातील तांबड्या पेशी वेगाने नष्ट होत होत्या. महिला आणि पुरुष या दोघांवरही अंतराळात याचा सारखाच परिणाम झाला. सुनीता विलियम्स बरेच दिवस अंतराळात राहिल्यामुळे तर ही बाब चिंतेची ठरते. त्यामुळे दीर्घकाळ लांबलेल्या अंतराळातील मुक्कामातून सुखरूप परतल्यावरही त्यांच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांकडे भारतीयांचे लक्ष लागून राहणार आहे. ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या यशस्वी लँडिंगनंतर सुनीता विलियम्ससह सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले, त्यावेळी घरवापसीचा आनंद सुनीता विलियम्सच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. पृथ्वीवर परतल्यानंतर लगेचच सुनीता यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यानातून बाहेर आणत असताना त्यांनी ‌‘थँक यू‌’ हा शब्द उच्चारत नासा आणि संपूर्ण जगाचे आभार मानत पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करून लवकरच भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.

शाश्वत जीवनशैली जगू या

मृणालिनी कुलकर्णी

मुंबईकरांनो आता तब्येती सांभाळा! अति उकाडा आणि सर्वत्र चाललेल्या बांधकामामुळे हवा प्रदूषित झालेली आहे. उष्णतेच्या लाटेत यूरोप होरपळला. ग्रीसमध्ये पेटलेला वणवा… मिळालेल्या माहितीनुसार हवामान बदलाच्या २०२३ मधील तीन घटना – १) जगभरातल्या महासागरांत उष्णतेचा उच्चांक. २) अंटार्टिकामधील बर्फाच्या आवरणाचा नीच्चांक.
३) आजवरचा सर्वात उष्ण महिना जून…

“एल निनोला ही पॉसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहाची एक विशिष्ट स्थिती आहे. साधारणपणे एल निनोलाला सुरुवात झाली की जगभरांत तापमानात वाढ दिसून येते. हा परिणाम ५/ ६ महिन्यांनंतर दिसतो. अशा दुर्घटनेत स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलाशी असतो. हवामान बदलाचे हे प्रश्न ग्लोबल जरी असले तरी उपाययोजना स्थानिक स्वरूपात होतात. ग्लोबल वार्मिंग हा हवामान बदलाचा एक पैलू आहे. जागतिक हवामान बदल म्हणजे तापमान आणि हवामानातील दीर्घकालीन बदल होय. सूर्याच्या क्रियाकलापातील बदलामुळे, ज्वालामुखीचा उद्रेक या नैसर्गिक क्रिया आणि मानवाकडून जाळल्या जाणाऱ्या जीवाष्म इंधनाच्या हरितवायूमुळे तापमान वाढते. हवामान बदलाचा सकारात्मक – नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था २३ मार्च १९५० मध्ये स्थापन झाली. या संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या ३१ देशांत भारत होता. या संघटनेचे १९१ देश सदस्य असून मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हात आहे. ही संस्था प्रत्येक राष्ट्राकडून हवामान बदलाच्या सांख्यिकीचा अहवाल गोळा करते आणि नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेत, होणारी जीवित हानी वाचवते. तसेच समाजाच्या सुरक्षितेसाठी, कल्याणासाठी तसेच सार्वजनिक, आर्थिक सुरक्षा, पर्यावरणाचे रक्षण या सेवेच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. याशिवाय पृथ्वीवरील विविध समस्येकडे लक्ष केंद्रित करत, मानवाचा शाश्वत विकासासाठी प्रयत्न करते. हवामान किंवा वातावरण बदल कुठल्याही राष्ट्राच्या, धार्मिक, राजकीय सीमा पाळत नाही. उलट हवामान अनुकूल राहण्यासाठी हवामान बदलाची कारणे समजून घेऊन काय दक्षता घ्यावी, कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याकडे संस्था लक्ष वेधते. यासाठी ‘२३ मार्च १९६१ पासून सुरू झालेला जागतिक हवामान दिन’ खूप महत्त्वाचा दिवस आहे.

हवामान दिन २०२५ ची दोन घोषवाक्य माझ्या वाचनांत आली. १ “हवामान बदल नाही, हवामान कृती” : हवामान कृती ही आपली नैतिक जबादारी आहे. हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दैनंदिन जीवनांत सामान्यांच्या लहान-लहान कृती देखील मोठा महत्त्वपूर्ण बदल घडवितात. २. लवकर इशारा देण्यामधील अंतर (तफावत) कमी करणे. म्हणजेच सर्वांसाठी हवामान बदलाच्या विपरीत परिणामाचा लवकर इशारा दिला जावा. जितके अंतर कमी तेवढे सगळ्यांना लवकर सूचना गेल्यास कारवाई लगेच सुरू होईल. एखाद्या ठिकाणी, विशिष्ट वेळेला वातावरणाची स्थिती म्हणजे हवा! हवा हे वायूंचे मिश्रण असून वातावरण हे वायूंचे बनलेले असते. यात नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑरगॉन या मुख्य घटकांबरोबर कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि ओझोन हे प्रारणशील घटक उष्णतेच्या प्रारणाचे शोषण किंवा उत्सर्जन करतात.

हवामान बदल – एखाद्या ठरावीक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातील बदल (किमान ३० वर्षांची सरासरी) म्हणजे हवामान बदल. हवामान शास्त्रांत वातावरण, जमीन आणि महासागर हे या प्रणालीचे भाग आहेत. हवामान शास्त्रांत वायुमंडळीय भौतिकशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास केला जातो. मेट्रोलॉजी म्हणजे मोजमापांचा अभ्यास. ‘ल्युक हावर्ड’ हे हवामानशास्त्राचे जनक आहेत. सतराव्या शतकांत थर्मामीटर आणि बॅरोमीटरचा शोध लागल्यानंतर वातावरणातील वायूच्या वर्तनासंबंधी माहिती समोर आली. उपनिषदात हवामानशास्त्र, सूर्य आणि पाऊस यांचा संबंध आहे. भारताच्या ‘पृथ्वी’ विज्ञान मंत्रालयाअंतर्गत हवामानाची माहिती पुरवली जाते. वेधशाळेत उपग्रह, रडारप्रणाली, सुपर कॉम्प्युटर ही आधुनिक उपकरणामुळे अचूकतेसाठी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर नेटवर्कमुळे या अचूक माहिती मिळते. जेणेकरून शेती, विमान वाहतूक, सागरी उद्योग यांना मदत होते. बाहेर जाण्याआधी हवामान अपडेट पाहावे.

हवामान बदलाची कारणे – बऱ्याच वर्षांपूर्वी होणारी तापमान वाढ ही पूर्णतः नैसर्गिक होती. (भूकंप, वणवा) १९७० च्या दशकानंतर होणारी तापमान वाढ ही मानवनिर्मित आहे. औद्योगिक क्रांती, घरातील भौतिक साधने, वाढलेली वाहनांची संख्या म्हणजेच मानवाकडून घरी, बाहेर जीवाश्म इंधनाचा वापर वाढला. वाढती लोकसंख्या, जंगलतोड, हवेत पसरलेले धूलिकण, सर्व देशांकडून वाढलेला ऊर्जेचा अनिर्बंध वापर, वाढलेले सर्व प्रकारचे प्रदूषण, सूर्यकिरणांची दाहकता या साऱ्यांमुळे निर्माण होणारे हरितगृह वायू सूर्याच्या किरणांपासूनची उष्णता अडवितात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. परिणामी चक्रीवादळे, दुष्काळ होतात. वाढलेले तापमान मौसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन दुष्काळ पडतो. वेगवेगळ्या भूभागाचे हवामान वेगवेगळे असते. तिथे राहणाऱ्या लोकांना त्याची सवय होते. प्रदेशाचे हवामान त्याच्या भौगोलिक स्थानानुसार विशिष्ट असते.

हवामान बदलाचे परिणाम – वाढलेल्या तापमानाचा शेतीवर, पिकाच्या उत्पादनांवर परिणाम होतो. मातीची सुपीकता पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. नाहीतर ती जमीन रेताड बनते. हे बदल प्रादेशिक नसून जागतिक आहेत. वाढत्या तापमानामुळे फक्त पृथ्वीचं उष्ण होत नाही तर पावसाचे प्रमाणही बदलते. जलवायू परिवर्तनानुसार जून, जुलैचा पाऊस ऑक्टोबर, नोव्हेंबरला पडतो. हिमनद्या वितळतात. ध्रुवीय अस्वलासारख्या अनेक प्राण्याचे अधिवास, वनस्पतीच्या प्रजाती धोक्यात आहेत. समुद्राची पाण्याची पातळी वाढून किनाऱ्यालगत पूर येतो. जमिनीची धूप वाढल्याने किनारपट्टीचे नुकसान होते. अन्न, पाणीटंचाई निर्माण होते.समुद्र अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्यामुळे, समुद्र आम्लधर्मी होतो. त्यामुळे समुद्र अन्न साखळीतील प्रवाळ हा पहिला दुवा नष्ट होत आहे. जंगले कार्बन डायऑक्साइड वायू शोषून महत्त्वाची भूमिका बजावतात. मोठ्या प्रमाणांत जंगलतोड होत असल्याने जैवविविधता नष्ट होत आहे.

हवामान बदलावर उपाय – १. सध्याची जंगलाखालची भूमी तीन ते चार पट वाढवायला हवी. २. सागरात प्लवकांची वाढ व्हावी. ३. कोळसा ऐवजी सौर ऊर्जेचा वापर. ४. ज्वलन असे हवे ज्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडला जाणार नाही. मुख्यतः कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन रोखले पाहिजे. ५. आपल्याला निसर्गाची गरज आहे. निसर्ग आणि पृथ्वी वाचवा. जे आपले एकमेव घर आहे. ६. प्लास्टिकचा वापर कमी करा. ७. सर्वांनी एकत्र येऊन समूहाने कार्य करावे. ८. सोशल मीडियातून चर्चा, परिसंवाद, पोस्टर प्रदर्शन यातून लोकांमध्ये जागरूकता वाढवा. जागतिक स्तरावर हवामान बदल रोखण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत. आपल्याकडे ८० टक्के शेतकरी पावसावर अवलंबून आहे. शेती आणि हवामान बदल यांचा संबंध या मुलाखतीत तज्ज्ञ आकाश बडवे सांगतात, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी साठवायला पाहिजे. तसेच देशी वाणातून (कडधान्य, बाजरी, गहू, भात, पालेभाज्या) मिळणारे उत्पादन कमी असलं तरी अशा वाणांमध्ये दुष्काळाशी सामना करण्याची क्षमता असते. बांगलादेशात खाऱ्या पाण्यात भाताचे पीक घेतले जाते. दक्षिण आफ्रिकेत कोरड्या जमिनीत मक्याचे पीक घेतले जाते, असे संशोधन भारतात व्हायला हवे. २३ मार्च जागतिक हवामान दिवस पृथ्वीचे महत्त्व, लोकांचे वर्तन, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध अधोरेखित करतात. पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग म्हणाल्या, ‘तुमच्या घराला आग लागल्यासारखे वागा. कारण आग लागल्यावरच त्वरित कारवाई होते. “पुढील पिढीला सुंदर जग द्यायचे असेल तर, वर्तन बदला नि निसर्ग वाचवा”. श्वास घ्यायला शुद्ध हवा हवी असेल तर त्यासाठी सवयी बदलणे गरजेचे आहे.
[email protected]

मराठेशाहीला नर्मदेच्या पलीकडे नेणारे पहिले सेनापती बाजीराव पेशवे

सतीश पाटणकर

कणाला थोर व्यक्तींची परंपरा लाभलेली आहे. तसाच उच्च संस्कृतीचा वारसाही लाभलेला आहे. गतकालीन लखलखती व्यक्तिरत्ने तरुण पिढीसमोर ठेवून तिच्यातील सुप्त चेतनाशक्ती जागृत करणे हा कोकण आयकॉन या नवीन सदराचा हेतू आहे. या सदरातील प्रत्येक व्यक्तिमत्त्व आपल्याला ऊर्जा देते, कार्यप्रवृत्त करते आणि आपला आत्मविश्वासही वाढवते.
बाळाजी विश्वनाथ भट हे मूळचे कोकणातील श्रीवर्धनचे. त्यांच्या घराण्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० सालापासून होती. दंडाराजपुरी तेथून जवळच जंजिरा त्यामुळे साहजिकच सिद्धीच्या त्रासाला कंटाळून बाळाजी देशावर आले. ताराबाई राजारामाची कर्तबगार पत्नी. राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसून पराक्रमाने ७ वर्षे औरंगजेबा बरोबर झुंज दिली. ताराबाई महाराणींचे सेनापती धनाजी जाधव यांच्याकडे बाळाजींनी चाकरी केली. ताराबाईंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या मृत्युपश्चात मोगलांनी शाहू महाराजांची १७०७ रोजी कैदेतून सुटका केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना अनेक मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. ताराराणींचा पक्षही मजबूत होता. शाहू महाराज दिल्लीवरून साताऱ्यास येण्यास निघाले. वाटेत खानदेशात ते आले. तेथे धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, शंकरजी नारायण, सचिव यांना शाहू महाराजांनी पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. त्यासाठी बाळाजी भटांना बरोबर घेऊन जाधवराव शाहू महाराजांना भेटले. पुढे शाहू महाराज साताऱ्यास आले. बहिरोपंत पिंगळे हे त्यांचे पेशवे होते. त्यांच्याकडे लोहगड व राजमाची किल्ला होता.

मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे ताराबाईंच्या पक्षातील. आंग्रेनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्ल्यात कैद करून पुण्याजवळील असलेले लोहगड, राजमाची किल्ले ताब्यात घेतले होते. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओळवण येथे त्यांना भेटले. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्र्यांचे जवळचे संबंध होते. आंग्रे यांनी समंजसपणा दाखवून वाद मिटविला. पिंगळे यांच्यावर शाहू महाराज नाराज झाले होते. त्यांना दूर करून पेशवाई दुसऱ्याला देण्याचा त्यांचा विचार झाला. खानदेशातून महाराज साताऱ्यास येत असताना बाळाजी विश्वनाथ त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यातील कर्तेपणा पारखून महाराजांनी २७ नोव्हेंबर १७१३ रोजी पेशवे पद बाळाजींना बहाल केले. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे महाराष्ट्रातील सर्व पराक्रमी सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवून घेतले. पुढे बाळाजींनी दिल्लीपर्यंत स्वारी केली व सासवड येथून आठ वर्षांपर्यंत कारभार सांभाळला. बाळाजी पेशवे १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे पद. पेशवे म्हणजे पंतप्रधान. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले. दरबारातील श्रीपतराव व अष्टप्रधानांनी हे पद कोकणस्थांमध्ये न देण्याचा आग्रह धरला. पण शाहू महाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते, तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण होता. तसेच बाळाजी विश्वनाथांबरोबर सतत राहिल्याने बाजीरावांना युद्धाचा तसेच राजकारणाचा अनुभव प्राप्त झाला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला. १७ एप्रिल १७२० रोजी शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरांवाना बहाल केली. बाजीराव त्यावेळी केवळ २० वर्षांचे होते.

बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा, तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले. बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही. मराठेशाहीला नर्मदेच्या पलीकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच. दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले. बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली. बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला. पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला असावा. बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.

सजग पालकत्वाची 4 C सूत्रे

डाॅ. स्वाती गानू

बऱ्याचदा पालक असं विचारतात की, जेव्हा एखाद्या परिस्थितीत किंवा प्रसंगात खूप संताप येत असेल तर त्या क्षणी Heat of the moment ला कसं वागावं? जेव्हा पालक आणि मुलं यांच्यात अतिशय तणावपूर्ण असं काही घडतं आणि पालक तणावात असतात, प्रचंड निराश होतात तेव्हा काय करावे? अशा परिस्थितीत हे 4 C चे सूत्र जाणीवपूर्वक/ बेसावध मनाशी बाळगलंत तर ते आपल्या दोन्ही मनांकरिता मार्गदर्शक ठरतं. शांत राहणं, स्पष्ट विचार ठेवणं, मुलांशी जोडलेलं राहणं, पालक आणि मुलं दोघांनी एकमेकांना जोडून घेऊन काम करणं. या चार सूत्रांमुळे आपण शांततेच्या मार्गाने मुलांबरोबर काम करू शकतो. जेव्हा आपण रिस्पॉन्ड करण्याऐवजी रिॲक्ट करतो तेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतो. ही परिस्थिती बदलायची असेल तर काय करायला हवं?

मुलांशी वागताना हलगर्जीपणा न करता, आपल्या कर्तव्याला न चुकता या 4 C सूत्रांचा वापर करा. जेव्हा आपल्याला सजग राहून कुटुंबात, विशेषतः मुलांमध्ये आणि आपल्यात मनाची शांतता टिकून ठेवायची असते. परिस्थिती हातातून निसटू द्यायची नसते, चिघळू नये असं वाटते तेव्हा हे चार शब्द आपले पालकत्व प्रभावी करायला मदत करतात. या चार पायऱ्यांचा जरूर वापर करा. पालकांनो याची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

१) शांत : (तणावपूर्ण परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे)
मुलांना ‘शांत हो’ म्हणण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करू या. जिला आपण कंट्रोल करू शकतो ती एकमेव व्यक्ती म्हणजे आपण स्वतः असतो आणि स्वतःला कसं सांभाळायचं हे कौशल्य शिकणं खरंच आवश्यक असतं. स्वतःला शिस्त लावणं ही मुलांना स्वयंशिस्त लावण्याची एक गुरुकिल्लीच असते. ही सवय जर लावलीत तर काम सोपं होतं याकरिताच या सवयीबाबत फोकस्ड राहा, त्याचा सराव करा. जेव्हा परिस्थिती गंभीर होते आणि त्रासदायक होते. विशेषतः आपण मुलांना एखाद्या गोष्टीसाठी ‘नाही’ म्हणतो. ती गोष्ट करण्यापासून परावृत्त करतो. करायचं नाही, ‘थांब’ म्हणतो, तेव्हा’ स्टॉप’ म्हणणं निदान त्या क्षणी सोडायचंय आणि दीर्घ श्वास घेणं, शांत राहणं जमवा. अगदी आणीबाणीच्या गंभीर परिस्थितीत जोपर्यंत उपाय मिळत नाही तोपर्यंत तरी थोडा ‘पॉज’ घ्या. स्वतःशी कनेक्ट व्हा म्हणजे तुमचं मन शिफ्ट होऊन शांत व्हायला सुरुवात होईल. तुमची ऊर्जा, तुमचं वागणं यावर सकारात्मक परिणाम होईल. मुलांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मुलांच्या भोवताली जी माणसं असतात, ती जशी वागतात, जे मॅनरिझम्स ते पाहतात, या गोष्टींचा त्यांच्यावर विशेषत्वाने प्रभाव पडतो. मुलांमध्ये आपल्याला जो बदल अपेक्षित आहे तो बदल खरंतर आपणच करायला हवा. आपण मुलांशी बोलताना शांतपणे घेतलं, ओरडून न बोलता गोड भाषेत बोललो तर परिस्थिती निवळत जाते. प्रत्येकच मूल ताबडतोब अशा पद्धतीने पालकाला असा प्रतिसाद देईल असे नाही पण परिस्थिती शांत होईल हे नक्की. स्वतःला कसे शांत कराल?

१. चेहरा थंड पाण्याने धुवा.
२. तिथून बाहेर जा. थोडं घराबाहेर पडा किंवा दुसऱ्या खोलीत जा.
३. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.
४. आता या क्षणी काय महत्त्वाचं आहे?

२. स्पष्ट विचार ठेवा :
या क्षणी सगळ्यात काय महत्त्वाचं आहे ते मनात स्पष्ट ठरवा. जेव्हा तुम्ही स्पष्ट आणि पारदर्शी विचार कराल की या परिस्थितीत मुलांशी वागताना काय महत्त्वाचं आहे ओरडणं, रागावणं, त्रागा, चिडचिड, संताप, हताशा की परिस्थिती नियंत्रणात आणणं, शांत होणं, शांत करणं तेव्हा यातून काही भरीव, सृजनात्मक निर्माण होईल. हे केव्हा जमेल जेव्हा ९० सेकंद तुम्ही तुमच्या भावना ओळखायला दिले तर शरीरात केमिकल प्रोसेस होते आणि तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. आपल्या सैरावैरा विचारांना सेटल करा आणि काय करणं महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष
एकाग्र करा.

३) मुलांशी कनेक्ट राहा :
एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेतल्या तर एकमेकांशी तुम्ही कनेक्ट राहाल? कनेक्शन म्हणजे काय तर मुलांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहायला शिका.
आपलं मूल काय विचार करतं, काय अनुभव घेतं यासाठी मुलांच्या काय गरजा आहेत ते माहीत करून घ्यायला हवं. आपल्या गरजा आई-बाबांना कळताहेत हे मुलांना समजलं की त्यांचं नकारात्मक वागणं कमी होईल. आपल्याकडे लक्ष दिलं जात आहे. आपलं म्हणणं ऐकलं जात आहे, समजून घेतलं जात आहे हे कळलं की मुलांमध्ये प्रेम आणि मायेची भावना व्यक्त करण्याला सुरुवात होते.

४) उपाय शोधणे :
मुलांशी कनेक्ट झालात तर मुलं तुम्हाला उपाय शोधायला सहकार्य करतात. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, भावना समजून घेण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हजर असता, उपलब्ध असता तेव्हा तुम्ही मुलांना सहकार्य करायला मदतच करता. तुम्हाला हे कळतं की मुलांच्या कोणत्या गोष्टींबाबत तडजोड करायची आणि कोणत्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायचं? त्यावर चर्चा करायची? अगदी मुलांनाच या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सहभागी करून घ्यायचं हेही जमू शकतं. पालकांनो अशा प्रकारे calm (शांत राहणे), clear (काय महत्त्वाचं आहे याबाबत विचारात स्पष्टता आणणे), connect (मुलांच्या भावना व गरजांना समजून घेणे) आणि collaboration (उपाय शोधणे) या C सूत्रांची प्रॅक्टिस केलीत तर पाचवं सूत्र तुम्हाला सापडेल ते असेल confidence अर्थात आत्मविश्वास. स्वतःच्या चुकांकडे सुधारणेच्या दृष्टीने पाहा आणि स्वतःचा पालक म्हणून रोजचे रोज विकास होऊ दे.