मुंबई: म्हाडाच्या (mhada) मुंबई मंडळाकडून काढम्यात आलेल्या सोडतीत काही विजेत्यांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. या सोडतीत ७७ अर्जदार विजेत्यांनी आपल्या पती अथवा पत्नीची माहिती लपवून स्वत:चा अर्ज भरला. मात्र या विजेत्यांची बनवाबनवी म्हाडाकडून पकडण्यात आली आहे. त्यांना या प्रकरणी खुलासा करण्याचे पत्र म्हाडाकडून पाठवण्यात आले आहे. दरम्यान, म्हाडाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर हे विजेते आपले मिळवलेले घर गमावू शकतात तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
मुंबई मंडळातील घरांसाठी २२ मे २०२३ला ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झाली होती. ४ हजार ८२ घरांसाठी ही सोडत होती. यात १ लाख ४५ हजार ८४९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ लाख २० हजार १४४ अर्ज सोडतीत सहभागी होती. याची सोडत १४ ऑगस्टला काढण्यात आली होती. दरम्यान, या सोडतीत लॉटरी लागण्यासाठी अर्जदारांनी विविध युक्त्या वापरल्याचे म्हाडाला आढळले.
अर्ज भरताना लग्न झाल्यास पती आणि पत्नीने एकच अर्ज भरायचा असतो. मात्र तसे असतानाही अनेकांनी स्वत:चा वेगळा आणि पत्नीचा वेगळा असा अर्ज भरल्याचे आढळले. दरम्यान, या सगळ्याची तपासणी केली असताना यात ७७ अर्जदारांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले. या विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया थांबवत तातडीने खुलासा करण्याचे पत्र विजेत्यांना देण्यात आल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या विजेत्यांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यास त्यांना मिळालेले घर रद्द करून प्रतीक्षा यादीतील लोकांना देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या विजेत्यांवर कायदेशीर कारवाईही केली जामार आहे.