Wednesday, May 27, 2026

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

Wrestling : भारतीय मल्लांचे आशियाई कुस्तीत वर्चस्व, २७ पदकांसह पटकावले सांघिक विजेतेपद

नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष मुक्तशैली संघाने दणदणीत कामगिरी करत सांघिक विजेतेपद पटकावले. भारताने किर्गिझस्तान आणि कझाकस्तानसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकत अजिंक्यपदाची मानकरी ठरला.

भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकूण २७ पदकांची कमाई केली. यात ११ सुवर्ण, ७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. मुक्तशैली, महिला कुस्ती आणि ग्रीको-रोमन या तिन्ही प्रकारांत भारतीय मल्लांनी दमदार छाप सोडली. पुरुष मुक्तशैली विभागात भारताने ९ पदके जिंकली. अक्षय टी धेरे (५७ किलो) आणि विकी (९७ किलो) यांनी सुवर्णपदक मिळवत भारताची विजयी सुरुवात केली. त्यानंतर कुमार मोहित (६५ किलो) आणि चंद्रमोहन (७९ किलो) यांनीही सुवर्णपदक पटकावत भारताची ताकद सिद्ध केली.

दीपक राठी (६१ किलो), पुनीत कुमार (९२ किलो) आणि लॅकी (१२५ किलो) यांनी रौप्यपदके जिंकून संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भर घातली. दीपक बेर्वाल (७४ किलो) आणि मोर सचिन (८२ किलो) यांनी कांस्यपदक मिळवत भारताचे पदक खाते अधिक भक्कम केले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “२३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे हा भारतीय कुस्ती इतिहासातील अभिमानास्पद क्षण आहे. आपल्या मल्लांनी तांत्रिक कौशल्य, जिद्द आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर आशियातील बलाढ्य देशांना मागे टाकले.”

महिला गटातही भारतीय महिला मल्लांनी वर्चस्व गाजवले. भारताने एकूण १० पदके जिंकली. मुस्कान (५३ किलो), तपस्या (५७ किलो), भाग्यश्री (६२ किलो), पुलकित (६७ किलो), मानसी (६८ किलो) आणि काजल (७६ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकून भारताचा झेंडा उंचावला.

नेहा (५९ किलो) आणि स्वीटी (५० किलो) यांनी रौप्यपदके मिळवली, तर अमृता (७२ किलो) आणि अहिल्या (५५ किलो) यांनी कांस्यपदकांची कमाई केली.

ग्रीको-रोमन प्रकारातही भारतीय मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी करत ८ पदके जिंकली. सुमितने ६३ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. सूरज (६० किलो) आणि सागर सिंह (६७ किलो) यांनी रौप्यपदके मिळवली.

नीरज पटेल (५५ किलो), सचिन (७७ किलो), रोहित बुरा (८७ किलो), रोहित (९७ किलो) आणि हरदीप (१३० किलो) यांनी कांस्यपदके जिंकून भारताची पदकसंख्या वाढवली.

या यशानंतर आता सर्वांचे लक्ष १७ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेकडे लागले आहे. दा नांग येथे आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय युवा मल्लांकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >