Monday, August 17, 2026

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ सांगता समारंभात ते बोलत होते. हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवादभाषा” हा महाराष्ट्राचा जयघोष असून, मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे, असेही ते म्हणाले.

यंदाच्या वर्षी १०५ दिवस चाललेल्या अभियानातून १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. “लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी…” या ओळी उद्धृत करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकविण्याचा मार्ग स्वीकारल्याचे कौतुक करत, “कायद्याने नाही, प्रेमाने भाषा शिकते,” असे शिंदे म्हणाले. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचे आवाहनही शिंदेंनी केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत, लेक लाडकी आणि आईचे नाव अधिकृत नोंदीत देण्याचे निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा ५० कोटींचा निधी भविष्यात १,००० कोटींवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, जीडीपी आणि परदेशी गुंतवणुकीत अव्वल असून दावोसमध्ये ३ व ४ लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक कार्यक्रमांत संसदेने मान्यता दिलेले अधिकृत वंदे मातरम् गायले जावे, अशी सूचना करत “मायबोलीची भक्ती, मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती” असल्याचा संदेश त्यांनी दिला. या प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी रिक्षा टॅक्सी चालक बंधू-भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >