Monday, August 17, 2026

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय आणल्याच्या आरोपांबाबत, भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजपचे मुंबई सचिव अखिलेश चौबे यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीद्वारे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात एफआयआर (FIR) नोंदवून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील एआयसीसी (AICC) मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत गायले जात असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चौबे यांनी आरोप केला आहे की, या व्हिडीओमध्ये सोनिया गांधी मंचावरील लोकांशी खुणांद्वारे संवाद साधताना दिसत आहेत आणि वंदे मातरमचा सुरुवातीचा भाग झाल्यानंतर ते थांबवण्याचा इशारा करत असल्याचेही दिसून येत आहे. तसेच, वंदे मातरम सुरू असतानाच राहुल गांधी यांनीही काही खुणा केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याआधी वंदे मातरम्' प्रकरणात कर्नाटकातील मंगळूर येथील उर्वा पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांकडून सोनिया गांधी यांच्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ गायले जात असताना ते दोन कडव्यांनंतर थांबवण्याचे निर्देश दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप नेते विकास पुत्तूर यांनी कर्नाटकमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता मुंबईत मालाडच्या दिंडोशी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली आहे. यामुळे सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘वंदे मातरम’चे गायन करण्यात आले. भाजपच्या आरोपानुसार, गीताची दोन कडवी झाल्यानंतर ते थांबवण्यात आले. कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने या घटनेला ‘वंदे मातरम’चा अवमान असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >