Saturday, August 15, 2026

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार

मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये व उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते झाले. (Eknath Shinde)

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, मंत्री व अधिकारी कार्यालयात बसून नव्हे तर मेळघाट, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जाऊन रुग्णालयांची पाहणी करत आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर गेल्यावरच त्रुटी दिसतात आणि छोटे प्रश्न तातडीने, तर मध्यम व दीर्घकालीन प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीने सोडवता येतात.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात २.५ ते ३ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. अर्ली कॅन्सर डिटेक्शनमुळे हजारो महिलांवर वेळेत उपचार शक्य झाले. माझ्या वाढदिवसाला आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या मॅमोग्राफी व्हॅनद्वारे स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान राज्यभर अधिक व्यापक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)

नुकत्याच ५०० मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट कार्यक्रमाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अशा मुलांना आर्थिक मदत सुरू राहील. भविष्यात जनुकीय निदानाद्वारे पुढील पिढी सुरक्षित करण्यासाठी शासन विशेष सहकार्य करणार आहे.

ठाण्यातील ९०० खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल रुग्णालय वर्षाअखेरीस सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी २०० खाटांचे महिला-बाल रुग्णालय, २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एअर ॲम्बुलन्ससाठी हेलिपॅडची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेत अधिसंख्य पदनिर्मिती करून त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

सिकल सेलमुक्त महाराष्ट्र, क्षयरोग निर्मूलन, स्वस्थ नारी–सशक्त परिवार, अरुणोदय मोहीम, मातृ-शिशु आरोग्य आणि ग्रामीण आरोग्य बळकटीकरण या उपक्रमांद्वारे राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. (Eknath Shinde)

समारोपात शिंदे म्हणाले, “रुग्णालये ही समाजाची पवित्र मंदिरे आहेत. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी हे देवदूत आहेत. आपण उत्तम सुविधा उभ्या करतो; मात्र त्या वापरण्याची वेळ कुणावरही येऊ नये, प्रत्येक नागरिक ठणठणीत व निरोगी राहावा, हीच स्वातंत्र्यदिनानिमित्त माझी सदिच्छा आहे.”

कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किसन कथोरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दौलत दरोडा, आमदार हरिश्चंद्र भोईर, आमदार शरद सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळंके, नगराध्यक्ष अमोल पाटील, प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी काटकर तसेच राज्यभरातील विविध लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >