Thursday, May 21, 2026

Raj Thackeray : राज ठाकरे तब्बल १८ वर्षांनंतर निर्दोष

Raj Thackeray : राज ठाकरे तब्बल १८ वर्षांनंतर निर्दोष

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने गुरुवारी कायदेशीर दिलासा दिला. २००८ मधील बहुचर्चित रेल्वे नोकर भरती आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या कथित चिथावणीखोर भाषण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने पुराव्याअभावी राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला.

२००८ मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण स्थानकावर परप्रांतीय, विशेषतः उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले होते. या आंदोलनात रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते आणि या हिंसाचाराला राज ठाकरे यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांची पार्श्वभूमी असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते; तसेच त्यांना अटकही करण्यात आली होती. या खटल्याच्या अंतिम सुनावणीच्या वेळी स्वतः राज ठाकरे न्यायालयात उपस्थित होते. मागील सुनावणीत त्यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदवताना, "या गुन्ह्याशी माझा कोणताही थेट संबंध नाही आणि आंदोलनाच्या वेळी मी नाशिक येथे होतो," अशी स्पष्ट भूमिका मांडली होती.

सरकारी तपासावर बोट

या प्रकरणाच्या निकालपत्रात न्यायालयाने सरकारी पक्षाच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. राज ठाकरे यांचा या गुन्ह्यातील थेट सहभाग स्पष्ट होईल किंवा त्यांच्यावर ठेवलेले आरोप सिद्ध होतील, असा एकही ठोस आणि वस्तुनिष्ठ पुरावा सरकारी पक्ष न्यायालयात सादर करू शकला नाही, असे निरीक्षण मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचा किंवा त्यांनी थेट हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले.

अस्वालाच्या अंगावरचा एक केस कमी झाला

या निकालावर समाधान व्यक्त करताना राज ठाकरे यांनी 'अस्वालाच्या अंगावरचा एक केस कमी झाला' अशी मिश्कील प्रतिक्रिया दिल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तत्कालीन सरकारने राजकीय हेतूने राज ठाकरे यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असेही जाधव म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >