Thursday, May 21, 2026

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मोठा तणाव निर्माण झाला. रेल्वे रुळालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत वस्त्या हटवण्यासाठी प्रशासन आणि पालिकेचं पथक घटनास्थळी पोहोचताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. कारवाई रोखण्यासाठी संतप्त जमावाने प्रशासन आणि पोलिसांच्या दिशेनं बादल्या, पाण्याच्या बाटल्या तसेच घरातील विविध वस्तू फेकून जोरदार विरोध दर्शवला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

गरीबनगर परिसरात रेल्वेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभारण्यात आली होती. काही ठिकाणी चार मजली इमारती तर काही भागात मोबाईल टॉवरदेखील उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या पाहणीत समोर आलं आहे. यापूर्वी पालिकेनं संबंधितांना नोटिसा बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात आलं नसल्याने प्रशासनाने अखेर मोठी तोडक कारवाई सुरू केली. या मोहिमेत काही अनधिकृत धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.

पालिकेच्या नियोजनानुसार दोन दिवसांत झोपडपट्टी परिसरातील सुमारे ५०० घरांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १०० घरांना तात्पुरतं संरक्षण देण्यात आल्यानं त्या घरांवर सध्या कारवाई होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात वाढत्या प्रवासी संख्येमुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. सध्या मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर वाढत्या गर्दीचा ताण जाणवत असून अतिरिक्त टर्मिनल स्टेशन आणि नव्या प्लॅटफॉर्मची गरज निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर वांद्रे टर्मिनसच्या विस्ताराचं काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या असलेलं डिझेल शेड स्थलांतरित करून त्या जागेवर नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. सात विद्यमान प्लॅटफॉर्मच्या पुढे आणखी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून त्यामुळे भविष्यात अधिक गाड्या हाताळणं शक्य होणार आहे. प्रशासनानं ही संपूर्ण तोडक कारवाई १९ मे ते २३ मे या पाच दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचं नियोजन केलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >